महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विधान परिषद निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर, काँग्रेसने दिली दोघांना उमेदवारी - विधान परिषदेसाठी काँग्रेसने दोघांना उमेदवारी

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने आपला दुसरा उमेदवारही शनिवारी रात्री घोषित केला. त्यामुळे विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. काँग्रेसने बीड जिल्हा अध्यक्ष राजकिशोर उर्फ पापा मोदी यांच्यासह जालन्याचे राजेश राठोड यांना उमेदवारी दिली आहे.

Congress nominates Rajesh Rathod for the Legislative Council
विधान परिषद निवडणूक

By

Published : May 9, 2020, 10:36 PM IST

मुंबई - विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने आपला दुसरा उमेदवारही शनिवारी रात्री घोषित केला आहे. त्यामुळे विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल वासनिक यांच्या सहीने प्रकाशित झालेल्या पत्रकात जालन्याचे राजेश राठोड यांचे नाव विधान परिषदेसाठी निश्चित करण्यात आले आहे. तर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी बीड जिल्हा अध्यक्ष राजकिशोर उर्फ पापा मोदी यांच्या नावाचीही घोषणा केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी 6 उमेदवार रिंगणात उतरवणार हे स्पष्ट झाल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर झाली आहे.

विधान परिषदेसाठी काँग्रेसकडून दोघांना उमेदवारी

संख्याबळानुसार भाजप 4, राष्ट्रवादी 2 आणि शिवसेना 2 आणि काँग्रेस 1 जागेवर निश्चित विजय मिळवू शकते. पण काँग्रेसने अतिरिक्त एक उमेदवार रिंगणात उतरवल्याने निवडणुकीत चुरस वाढणार आहे. महाविकास आघाडीला आपले 6 उमेदवार निवडणूक आणण्यासाठी 174 मतांची आवश्यकता आहे. तर भाजपला आपले 4 उमेदवार निवडून आणण्यासाठी 116 मतांची आवश्यकता आहे. सत्ताधारी आणि विरोधकांना ही अतिरिक्त मतांची गरज असून आता सर्व भिस्त छोटे पक्ष आणि अपक्ष मतांवर असणार आहे. विश्वादर्शक ठरावात महाविकास आघाडीने 170 मतांचे संख्याबळ सिद्ध करून सरकार स्थिर केले होते. मात्र, आघाडीला अतिरिक्त 4 मतांची आवश्यकता आहे. तर दुसरीकडे आपले 4 उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपला अतिरिक्त 7 मतांची गरज आहे. काँग्रेसने आपला दुसरा उमेदवार मैदानात उतरवल्याने अपक्षांचे महत्व वाढले आहे. गुप्त मतदान पद्धत असल्याने 10 उमेदवार रिंगणात असल्याने मतांची बेगमी कुणाच्या पारड्यात पडते यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधीमंडळाचे सदस्य करून घटनात्मक पेच टाळण्यासाठी कोरोनाचा प्रादुर्भाव असताना देखील अतिशय आणीबाणीच्या काळात निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. ठाकरे यांना कोणतीही अडचण होऊ नये, यासाठी दक्षता म्हणून शिवसेना आणि राष्ट्रवादी ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या तयारीत होते. मात्र, काँग्रेसने एक अतिरिक्त उमेदवार दिल्याने आघाडीतही आलबेल नसल्याचेच चित्र आहे.

विधान परिषदेच्या ९ जागांसाठी येत्या २१ मे रोजी निवडणूक होत आहे. भाजपने नागपूरचे माजी महापौर प्रविण दटके, धनगर समुदायाचे नेते गोपीचंद पडळकर, राष्ट्रवादीतून भाजपत आलेले रणजितसिंह मोहिते-पाटील आणि भाजपच्या डॉक्टर्स सेलचे डॉ. अजित गोपछडे यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीकडून माजी मंत्री शशिकांत शिंदे आणि विदर्भातील अमोल मिटकरी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. काँग्रेसकडून जालन्याचे युवा कार्यकर्ते राजेश राठोड आणि बीडचे जिल्हाअध्यक्ष राजकिशोर उर्फ पापा मोदी यांच्या नावाची घोषणा पक्षाने केली आहे.

शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधान परिषदेच्या उप सभापती निलम गोऱ्हे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ही सोमवारपर्यंत असल्याने महाराष्ट्र विकास आघाडीचे सर्व उमेदवार आपले उमेदवारी अर्ज सोमवारी दाखल करणार आहेत. संख्याबळानुसार ज्या उमेदवाराला 29 मते मिळतील त्या उमेदवाराच्या गळ्यात आमदारकीची माळ पडणार आहे.

विधानसभेत असणारे पक्षीय बलाबल

भाजप – १०५, शिवसेना -५६, राष्ट्रवादी काँग्रेस -५४, काँग्रेस – ४४, बहुजन विकास आघाडी – ३, समाजवादी पार्टी – २, एम आय एम – २, प्रहार जनशक्ती – २, मनसे – १, माकप – १, शेतकरी कामगार पक्ष – १, स्वाभिमानी पक्ष – १, राष्ट्रीय समाज पक्ष – १, जनसुराज्य पक्ष – १, क्रांतिकारी शेतकरी पक्ष – १, अपक्ष – १३

ABOUT THE AUTHOR

...view details