महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 17, 2023, 10:43 PM IST

ETV Bharat / state

Venugopal Met Uddhav Thackeray : वेणुगोपाल यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट; सावरकरांवरील काँग्रेसच्या भूमिकेबद्दल म्हणाले...

उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे महासचिव के.सी. वेणुगोपाल यांची आज मातोश्रीवर भेट झाली. यावेळी या दोघांमध्ये विविध मुद्यांवर चर्चा झाली. भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी वेणुगोपाल यांचे आभार मानून देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आम्ही एकत्र आल्याचं म्हटलं आहे.

Uddhav Thackeray Meet Venugopal
उद्धव ठाकरे केसी वेणुगोपाल भेट

मुंबई :काँग्रेसचे महासचिव के.सी. वेणुगोपाल यांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. उभय नेत्यांच्या बैठकीनंतर त्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, शिवसेना खासदार संजय राऊत, मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप, शिवसेना युवा अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्यासह दोन्ही पक्षांचे नेते उपस्थित होते.

उद्धव ठाकरे आणि काँग्रेस सोबत : या प्रसंगी बोलताना वेणुगोपाल राव म्हणाले की, सध्या देशामध्ये अराजकता, हुकूमशाही सुरु आहे. ती संपवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा एक लढा सुरु आहे. त्यांच्यासोबत आम्ही ठामपणे उभं असल्याचं सुद्धा वेणुगोपाल राव यांनी यावेळी सांगितलं. या प्रसंगी उद्धव ठाकरे यांनी वेणुगोपाल यांचे आभार मानून देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आम्ही एकत्र आल्याचं म्हटलं.

राहुल गांधी यांची अनुपस्थिती :के. सी. वेणुगोपाल यांच्यासोबत काँग्रेस नेते राहुल गांधी सुद्धा उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची चर्चा होती. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत बोलताना राहुल गांधी हे उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असं सांगितलं होतं. परंतु काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत बोलताना राहुल गांधी हे सध्या उद्धव ठाकरे यांची भेट घेणार नसून काँग्रेस महासचिव वेणुगोपाल राव हे भेटणार घेणार असल्याचं सांगितले. त्या प्रमाणे आज या नेत्यांची भेट झाली असून त्यांच्यात अनेक विषयावर चर्चा झाली आहे.

सावरकरांच्या प्रश्नावर काँग्रेसची भूमिका काय? : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला सडेतोड उत्तर दिले होते. या मुद्यावरून दोन पक्षांत अनेकदा खटके देखील उडाले आहेत. याच प्रश्नावर काँग्रेसची भूमिका काय आहे? याबाबत चर्चा करण्यासाठी ही भेट महत्त्वाची होती. परंतु आजच्या भेटीमध्ये या विषयावर जास्त चर्चा झाली नसून, लवकरच राहुल गांधी व उद्धव ठाकरे यांची भेट होणार असून दोन्ही बाजूने यावर तोडगा काढला जाईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

'लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी एकत्र आलो' :या भेटी बाबत बोलताना के. सी. वेणुगोपाल म्हणाले की, 'काँग्रेस उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. सर्व विरोधी पक्ष भाजपविरोधात एकत्रितपणे लढण्यास तयार असून आम्ही नरेंद्र मोदी यांच्या हुकूमशाहीविरोधात एकत्र लढणार आहोत. आम्ही सर्व सोबत आहोत, हा मेसेज या भेटीतून आम्हांला द्यायचा आहे. आम्ही जेव्हा दोस्ती करतो तेव्हा ते एक नातं तयार होतं. हे एक समीकरण झाले आहे. आता मित्र कोण आणि विरोधक कोण, हे आमच्या व्यवस्थित लक्षात आलं आहे. काहींनी शिवसेनेसोबत गद्दारी केली आहे. आम्ही मात्र लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी एकत्र आलो आहोत.' या नंतर वेणुगोपाल यांनी उद्धव ठाकरेंना दिल्लीला येण्याचं निमंत्रण दिलं असून लवकरच राहुल गांधी व उद्धव ठाकरे यांची भेट होणार असल्याचे त्यांनी सांगितलं.

हेही वाचा :Bawankule Criticism Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंना सत्तेचे व्यसन; बावनकुळेंची टीका

ABOUT THE AUTHOR

...view details