मुंबई : मुंबई भारताची आर्थिक राजधानी ( Mumbai is financial capital of India ) असून जागतिक दर्जाचे शहर म्हणून याला ओळख आहे. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. यासाठी पालिकेने मुंबईमध्ये सौंदर्यीकरण करून पर्यटकांची संख्या वाढवण्याचा निर्णय ( Decision to increase number of tourists ) घेतला आहे. मात्र मुंबईमध्ये अनेक पदपथ, रस्ते आणि जंक्शनची अवस्था खराब असल्याचे दिसत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे नसल्याने नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन रस्ते ओलांडावे लागत आहे.
मुंबईमध्ये अशी आहे परिस्थिती :मुंबईमध्ये एकीकडे सौंदर्यीकरण केले जाणार असे सांगितले जात असले तरी शहरातील अनेक ठिकाणी पदपथ खोदण्यात आल्याचे दिसून येत आहेत. रस्त्यावर कचरा आणि बॅरिकेट्स लावण्यात आले आहे. अशा ठिकाणी कचरा साचलेला दिसत आहे. ज्या ठिकाणी पालिकेची कामे सुरु आहेत त्याचा कचरा रस्त्याच्या कडेला टाकलेला दिसत आहे. रस्त्याच्या कडेला अनेक ठिकाणी सार्वजनिक शौचालये बनवण्यात आली आहेत. त्याठिकाणी घाणीचे पाणी रस्त्यावर आल्याचे दिसत आहे. अनेक जंक्शनवर रस्ता ओलांडण्यासाठी झेब्रा क्रॉसिंग नसल्याने नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत आहे. अशी परिस्थिती सध्या मुंबईमध्ये पाहायला मिळत आहे.
सौंदर्यीकरणावर भर : मुंबईमध्ये गेल्या काही वर्षात सौंदर्यीकरणावर भर देण्यात आला आहे. माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून मुंबई सुशोभिकरण प्रकल्पांतर्गत रस्ते, पूल, पदपथ, वाहतूक जंक्शन, उद्यान, समुद्र किनाऱ्यांचे सौंदर्यीकरण केले जाणार आहे. सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, आकर्षक रंगीबेरंगी रोषणाईची कामे करण्यात येणार आहेत. मात्र हे काम म्हणावे तसे जलदगतीने झालेले नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार जाऊन एकनाथ शिंदे आणि भाजपाचे सरकार सत्तेवर आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मुंबईच्या सौंदर्यीकरणाचे आदेश पालिकेला दिले आहेत. त्यानुसार मुंबईमध्ये सौंदर्यीकरणावर १,७२९ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. त्यामधील ९०० कोटी रुपये आकस्मिक निधीमधून खर्च करण्यास पालिका आयुक्त असलेल्या प्रशासकांनी मान्यता दिली आहे.