महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 27, 2019, 5:15 AM IST

ETV Bharat / state

जागतिक दर्जाच्या रस्त्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी बोलावली "सह्याद्री" अतिथी गृहावर बैठक

रस्त्यावर टाकण्यात येणारे डेब्रिज, कचरा यामुळे रस्त्याची अवस्था खराब झाली आहे. मुंबईत पर्यटकही मोठ्या प्रमाणात येतात. त्यांनाही रस्त्यांच्या खराब अवस्थेमुळे त्रास होतो. त्यामुळे नागरिकांना चांगले रस्ते मिळावे यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सह्याद्री अतिथी गृहात पालिका अधिकाऱ्यांची आज बैठक आयोजित केली आहे.

mumbai
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई - जागतिक दर्जाचे शहर म्हणून ओळख असलेल्या मुंबईमधील रस्ते जागतिक दर्जाचे असावेत. रस्त्यावर कचरा नसावा. रस्त्यांचे सुशोभीकरण केले जावे यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सह्याद्री अतिथी गृहावर पालिका अधिकाऱ्यांची एक बैठक बोलावली आहे. या बैठकीत जाहिरातीचे धोरणही ठरवले जाणार आहे.

मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. मुंबईला जागतिक दर्जाचे शहर म्हणून ओळखले जाते. मात्र, या शहरातील रस्त्यांवरून पालिकेवर वेळोवेळी टिका झाली आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे, रस्त्यावर टाकण्यात येणारे डेब्रिज, कचरा यामुळे रस्त्याची अवस्था खराब झाली आहे. मुंबईत पर्यटकही मोठ्या प्रमाणात येतात. त्यांनाही रस्त्यांच्या खराब अवस्थेमुळे त्रास होतो. त्यामुळे नागरिकांना चांगले रस्ते मिळावे यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सह्याद्री अतिथी गृहात पालिका अधिकाऱ्यांची आज बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला पालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी, सर्व 24 विभागाचे सहाय्यक आयुक्त, प्रमुख अभियंता (रस्ते), प्रमुख अभियंता (घन कचरा व्यवस्थापन), सर्व परिमंडळ उपायुक्त, सहआयुक्त, अतिरिक्त आयुक्त उपस्थित राहणार आहेत.

या बैठकीत मुंबई हद्दीतील रस्त्यांवरील विशेषकरून पूर्व व पश्चिम द्रुतगती मार्ग व पदपथावरील डेब्रिज काढून टाकणे, पदपथाची दुरुस्ती, परिरक्षण व सुधारणा करणे, रस्ते दुभाजक, नामफलक रस्ते व पदपथावर लावणे, सार्वजनिक जाहिराती व जाहिरात फलकाबाबत धोरणाची आखणी व अंमलबजावणी करणे, शहरातील रस्ते पदपथ सुंदर व आकर्षक दिसावेत म्हणून रस्त्यांवरील अतिक्रमणे, डेब्रिज, कचरा हटविणे, स्वच्छता, साफसफाई, रंगरंगोटी करणे यावर चर्चा होणार आहे.

रस्त्यांचा चेहरा बदलणार

रस्ते आणि पदपथावर काही छोटे बदल असल्यास दोन ते तीन महिन्यात करावेत. तसेच मोठे बदल असल्यास मे 2020 पूर्वी करावेत. त्यासाठी प्रभाग समिती अध्यक्ष व पोलीस उपायुक्त यांची बैठक घेऊन पोलीस बंदोबस्त घेऊन अतिक्रमणावर कारवाई करावी, असे आयुक्तांनी म्हटले आहे.

एमएमआरडीएला दणका

नंदादीप कलव्हर्ट येथे बिकेसी उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर डेब्रिज टाकण्यात येते. हे डेब्रिज त्वरित हटवून पुन्हा डेब्रिज जमा होणार नाही याची दखल घ्यावी. असे पत्रच एमएमआरडीए आयुक्त व एमएमआरसीएलच्या व्यवस्थापकीय संचालक यांना पालिका आयुक्तांनी पाठविले आहे.

हेही वाचा-'दिल्लीतून उगम पावलेले हे ग्रहण कधी सुटणार?'

ABOUT THE AUTHOR

...view details