महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'शेतकऱ्यांना लवकर पिककर्ज मिळण्यासाठी बँकांच्या शाखांपर्यंत शासनाचे निर्देश पोहोचवा' - पिककर्ज न्यूज

कोरोना महामारीमध्ये ऐन खरीप हंगामामध्ये बी बियाणांचा तुटवडा पडू देऊ नका. बोगस बियाणांच्या प्रकारात कडक शिक्षा होईल. कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रीयीकृत बँकांकडून शेतकऱ्यांना लवकरात लवकर पिककर्ज मिळण्यासाठी बँकांच्या शाखांपर्यंत शासनाचे निर्देश पोहोचवा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

CM Uddhav thackeray comment on Crop loan
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

By

Published : Jun 8, 2020, 10:49 PM IST

मुंबई - कोरोना महामारीमध्ये ऐन खरीप हंगामामध्ये बी बियाणांचा तुटवडा पडू देऊ नका. बोगस बियाणांच्या प्रकारात कडक शिक्षा होईल. कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रीयीकृत बँकांकडून शेतकऱ्यांना लवकरात लवकर पिककर्ज मिळण्यासाठी बँकांच्या शाखांपर्यंत शासनाचे निर्देश पोहोचवा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. शेतकऱ्यांना पिककर्ज मिळत नाही अशी तक्रार आली नाही पाहिजे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

कृषी खरीप हंगाम कामांचा आढावा व बी बियाणे, खते, किटकनाशके, पिक कर्ज वाटप, कापूस, तुर व धान खरेदी बाबत आज मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. यावेळी कृषी मंत्री दादाजी भुसे, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील सहभागी झाले होते. यावेळी मुख्य सचिव अजोय मेहता, सचिव कृषी एकनाथ डवले, प्रधान सचिव सहकार आभा शुक्ला, प्रधान सचिव पदुम व पणन अनुप कुमार, सचिव, अन्न व नागरी पुरवठा संजय खंदारे, व्यवस्थापकीय संचालक, कापूस उत्पादक महासंघ नवीन सोना,आयुक्त कृषी सुहास दिवसे, व्यस्थापकीय संचालक, महाबीज उपस्थित होते.

खरीप हंगामासाठी ४३.५० लाख मेट्रिक टन इतकी मागणी केंद्राकडे नोंदवली होती. त्यापैकी ४० लाख मेट्रिक टन पुरवठ्यास मंजुरी आली आहे. याशिवाय ५० हजार मेट्रिक टन युरियाचा संंरक्षीत साठा करण्यात येत आहे.

५ लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना बांधावर बियाणे

खते व बी बियाणे बांधावर पुरवण्यासाठी ४७ हजार ८९ शेतकरी गट तयार करण्यात आले आहेत. १ लाख ५५ हजार ७५५ मेट्रिक टन खत, ८६ हजार १२६ मेट्रिक टन बियाणे, १ लाख ८० हजार ४८१ कापूस बियाणे पाकिटे बांधावर देण्यात आली आहेत. एकूण ५ लाख २७ हजार ४८३ शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला आहे.

कापूस, तूर खरेदी

एकंदर ३८१ लक्ष क्विंटल कापूस खरेदी झाली असून, ९ लाख क्विंटल खरेदी राहिली आहे. १८.८१ लाख क्विंटल तूर खरेदी झाली असून २ लाख शेतकऱ्यांकडून तूर खरेदी करण्यात आली आहे. ८२२ कोटी रुपयांचे चुकारे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. १८.९० लाख क्विंटल चणा खरेदी झाली असून, १५ जुलैपर्यंत मुदतवाढ मागण्यात आली आहे. याचेही चुकारे लवकरच शेतकऱ्यांना देण्यात येतील.

पिक कर्ज वाटपाला गती द्यावी

यावेळी बोलताना कृषी मंत्री दादा भुसे तसेच सहकार मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले की, पिक कर्ज वाटपाला अधिकाधिक गती देण्याच्या सुचना यंत्रणेला देण्यात आल्या असून, बँकांच्या संपर्कात अधिकारी आहेत. यावेळी प्रधान सचिव आभा शुक्ला यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून एकूण ४६ टक्के तर राष्ट्रीयकृत बँकांकडून ७ टक्के पिककर्ज वाटप झाल्याची माहिती दिली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी ६ हजार २५० कोटी तर राष्ट्रीयकृत बँकांनी २ हजार ३०० कोटी रुपये पिककर्ज वाटप केल्याचे त्या म्हणाल्या. बँकांच्या प्रत्येक शाखांपर्यंत शासनाचा २२ मे चा शासन निर्णय पोहोचवणे सुरू असून शेतकऱ्यांना पिककर्जात अडथळा येऊ नये अशा सूचना दिल्याचेही त्या म्हणाल्या.

निसर्ग चक्रीवादळ शेतीचे नुकसान
निसर्ग चक्रीवादळामुळे रत्नागिरी आणि रायगड येथे ४ हजार ६५० हेक्टर जमीन आणि १८ हजार हेक्टर फळपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहितीही देण्यात आली.

ABOUT THE AUTHOR

...view details