महाराष्ट्र

maharashtra

अयोध्येत 'असे' बांधण्यात येणार महाराष्ट्र भवन, मुख्ममंत्री एकनाथ शिंदे ९ एप्रिलपासून युपीच्या दौऱ्यावर

By

Published : Apr 7, 2023, 8:04 AM IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ४० आमदारांना सोबत ९ एप्रिल रोजी अयोध्या दौऱ्यावर जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील महाराष्ट्र भवनसाठी प्रास्तावित जागेचा शोध राज्य सरकारने सुरू केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा करून यावर शिक्कामोर्तब केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

महाराष्ट्र भवन अयोध्या
Maharashtra Bhavan in Ayodhya

मुंबई - अयोध्येत येणाऱ्या प्रत्येक भाविकाला महाराष्ट्रातील रितीरिवाज, संस्कृती, कला आणि जडणघडणीची माहिती व्हावी यासाठी लवकरच महाराष्ट्र भवन उभारले जाणार आहे. महाराष्ट्रातील गड किल्ले, थोर महापुरुषांच्या प्रतिमा, खाद्य संस्कृती आणि महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशमध्ये जाणाऱ्या जनतेला राहण्याची सुविधा या महाराष्ट्र भवनमध्ये उपलब्ध करून देण्याचा राज्य सरकारकडून प्रयत्न आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भवनच्या कामाला गती येणार असल्याचे दिसत आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांचा दौरा ऐतिहासिक असणारमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांसोबत ४० आमदार असणार आहेत. दौऱ्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी गुरुवारपासून उत्तर प्रदेशात तळ ठोकून आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत देखील शुक्रवारी ७ एप्रिलला अयोध्येला रवाना होणार आहेत. भाजपबरोबर युतीकरून सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्या दौरा करणार असल्याचे जाहीर केले होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत उत्तर प्रदेशात उभारण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भवन संदर्भात चर्चा केली जाणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली. तसेच, उत्तर प्रदेशातून मुंबईत आलेल्या लोकांना सोयी सुविधा आणि सहकार्य करायचे यावर मुख्यमंत्री शिंदे चर्चा करणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांचा हा ऐतिहासिक दौरा असेल, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.

दिल्लीच्या धर्तीवर असे बांधण्यात येणार महाराष्ट्र भवन - दिल्लीत जाणाऱ्या महाराष्ट्रीयन जनतेसाठी महाराष्ट्र सदन उभारण्यात आले आहे. याच धर्तीवर उत्तरप्रदेशमध्ये महाराष्ट्र भवन उभारले जाणार आहे. राज्यातील ऐतिहासिक वाड्यांच्या स्वरूपात महाराष्ट्र भवन बनवण्याचा प्रयत्न असणार आहे. लोकप्रतिनिधी, महत्वाच्या व्यक्ती आणि महाराष्ट्रातून जाणाऱ्या नागरिकांच्या निवासाकरिता सुमारे दोनशेहून अधिक खोल्या बांधण्यात येणार आहेत. महाराष्ट्र भवनाच्या इमारतीत शाहू महाराज यांचा पुतळा बसवणे, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदान दिलेल्या हुतात्म्यांचे प्रतिक, गानसम्राज्ञी दिवंगत लता मंगेशकर, सुप्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, कुस्तीपटू खाशाबा जाधव आदी महनीय व्यक्तींच्या कार्याचा गौरव म्हणून प्रतिमा लावण्याचे सरकारच्या विचाराधीन आहेत. सुंदर, सुबक आणि आकर्षक अशी वास्तू साकारण्याचा महाराष्ट्र सरकारचा प्रयत्न असणार आहे. महाराष्ट्र भवनातून महाराष्ट्राची थोरवी गायिली जाईल, याकडे सरकारचा भर असणार आहे. महाराष्ट्र भवनाच्या प्रांगणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर , छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, आदी महापुरुषांचे पुतळे उभारण्याचे नियोजन सरकाकडून करण्यात येत आहे.

ठाकरेंची मागणी मुख्यमंत्र्यांनी रेटली -अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारण्याची घोषणा तत्कालीन मंत्री आदित्य ठाकरे यांनी १६ जून २०२२ रोजी अयोध्येत जाऊन केली होती. शिवसेना आणि अयोध्या यांचे जिव्हाळ्याचे नाते संबंध आहेत. प्रथम मंदिर, नंतर सरकार अशी घोषणा शिवसेनेने २०१८ मध्ये दिली होती. राम मंदिर उभारण्याच्या कामाला यानंतर वेग आला. दरम्यान, शिवसेनेसाठी अयोध्या दौरा आस्थेचा विषय आहे. जगभरातून लोक अयोध्येत रामाच्या दर्शनाला येतात.

हेही वाचा-CM Shinde On Aaditya Thackeray: फडणवीसांवर बोलण्याचा ठाकरेंना अधिकार नाही - मुख्यमंत्री

ABOUT THE AUTHOR

...view details