महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सरकारला कोणताही अल्टीमेटम नाही; मात्र, कधीही आंदोलनाला बसणार! - chhatrapati sambhajiraje to maharashtra government

संसदीय अधिवेशनात घटना दुरुस्ती करून केंद्र सरकारने राज्य सरकारला मागास प्रवर्ग तयार करण्याचा अधिकार दिले आहेत. त्यामुळे आरक्षण मिळण्यासाठी मराठा समाजाला राज्य सरकारला मागास सिद्ध करावे लागेल. त्या दिशेने राज्य सरकारने पावले उचलण्याची गरज आहे.

sambhajiraje chhatrapati
संभाजीराजे छत्रपती

By

Published : Sep 8, 2021, 2:59 PM IST

Updated : Sep 8, 2021, 5:25 PM IST

मुंबई - मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मूक आंदोलन केली. या मूक आंदोलनानंतर राज्य सरकारने चर्चेसाठी बोलावलं होतं. या बैठकीतून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक पाऊल उचलले, अशा प्रकारचे आश्वासन देण्यात आले. मात्र, दोन महिने उलटून गेल्यानंतरही मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार गंभीर दिसत नाही. राज्य सरकारकडून अद्याप कोणत्याही मुद्द्यावर सकारात्मक पाऊल उचलले गेले नसल्याची खंत राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली आहे.

मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलताना संभाजीराजे छत्रपती

आरक्षण आणि मराठा समाजातील तरुण आणि विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सवलती लवकरात लवकर सुरू व्हाव्यात यासाठी पुन्हा एकदा मराठा समाजाला आंदोलन करावं लागेल का? असाही प्रश्न राज्य सरकारला संभाजीराजे छत्रपती यांनी विचारला आहे. मात्र, सध्या कोरोना परिस्थिती असल्यामुळे आंदोलन होऊ नये, अशी भूमिका मराठा समाजाची आहे. पण मराठा समाजाने मला एकट्याला आंदोलन करण्यास सांगितलं तर, कोणत्याही क्षणी आपण मुंबईतील आझाद मैदानात मराठा आरक्षणाचा बाबतीत आंदोलनाला बसू, असा इशारा संभाजीराजे यांनी राज्य सरकारला दिला आहे.

मुंबईत आज (बुधवारी) आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तसेच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होऊन दोन महिने झाल्यानंतरही मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आणि तरुणांना काही सवलती उपलब्ध व्हाव्यात यासाठी मागण्या केल्या होत्या. मात्र, अधिकाऱ्यांच्या बेपर्वाईमुळे अद्यापही मराठा समाजातील तरूण आणि विद्यार्थ्यांना काही सवलती मिळाल्या नसल्यामुळे अधिकाऱ्यांवरही संभाजीराजे यांनी संताप व्यक्त केला.

हेही वाचा -बेळगावमध्ये मराठी माणसाचा विजय तर संजय राऊत यांच्या अहंकाराचा पराभव - फडणवीस

आधी मराठा समाजाला मागास सिद्ध करा -

संसदीय अधिवेशनात घटना दुरुस्ती करून केंद्र सरकारने राज्य सरकारला मागास प्रवर्ग तयार करण्याचा अधिकार दिले आहेत. त्यामुळे आरक्षण मिळण्यासाठी मराठा समाजाला राज्य सरकारला मागास सिद्ध करावे लागेल. त्या दिशेने राज्य सरकारने पावले उचलण्याची गरज आहे. मात्र, अद्यापही राज्य सरकार याबाबत धोरणात्मक पाऊल उचलत नसल्याचंही संभाजीराजे म्हणाले. तसेच ज्या तरुणांच्या नियुक्त्या झाल्या आहेत, त्याबाबत तत्काळ निर्णय घ्यायला हवा होता. त्या बाबतही अद्याप कोणताही निर्णय राज्य सरकारने घेतलेला नाही. ओबीसी समाजातील विद्यार्थी आणि तरुणांना असलेल्या सवलती मराठा समाजातील विद्यार्थ्यां आणि तरुणांना दिल्या जाव्यात. या मागणीकडे देखील अद्याप राज्य सरकारने लक्ष दिले नसल्याचेही यावेळी संभाजीराजे यांनी सांगितले.

आंदोलनाचा राज्य सरकारला इशारा -

राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागणीकडे तातडीने लक्ष द्यावे. नाहीतर पुन्हा एकदा मराठा समाजाला रस्त्यावर उतरून आंदोलने करावी लागतील. सध्या राज्यामध्ये कोरोना परिस्थिती असल्यामुळे आंदोलन होऊ नये, यासाठीच मराठा समाज प्रयत्न करत आहे. मात्र, राज्य सरकारने मराठा समाजाची सहनशीलता पुन्हा एकदा पाहू नये. कोणत्याही क्षणी मराठा समाज आंदोलनाला तयार आहे. यावेळेस पुन्हा एकदा मराठा समाजाला जर, आंदोलन करावे लागले तर यासाठी सर्वस्वी जबाबदार राज्य सरकार असेल असा इशाराही संभाजीराजेंनी दिला आहे.

Last Updated : Sep 8, 2021, 5:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details