महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 16, 2021, 7:18 PM IST

ETV Bharat / state

कोरोना स्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राच्या मार्गदर्शक सूचना; टाळेबंदीला नागरिकांचा विरोध

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य विभागाच्या सचिवांनी महाराष्ट्राचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पत्र पाठवून मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. राज्यात विविध ठिकाणी संचारबंदी, अंशत: टाळेबंदी, कडक टाळेबंदी लागू करून गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, जवळपास सर्वत्र टाळेबंदीला व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांनी विरोध केल्याचे दिसून आले.

मुंबई
मुंबई

मुंबई- राज्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असून गेल्या काही दिवसांपासून 15 हजाराहून अधिक रुग्ण संक्रमित होत आहेत. महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य विभागाच्या सचिवांनी महाराष्ट्राचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पत्र पाठवून मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. राज्यात रुग्णसंख्या वाढत असल्याने विविध जिल्ह्यांंमध्ये संचारबंदी, अंशत: टाळेबंदी, कडक टाळेबंदी लागू करून गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. पण, जवळपास सर्वत्र टाळेबंदीला व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांनी विरोध केला असून टाळेबंदीऐवजी कडक नियम लागू करून दंडही वाढवावा, अशी मागणी केली जात आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आजपासून राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र, याकडे नागरिकांनी दुर्लक्ष केले. त्याचा प्रत्यय मुंबईतील दादरच्या भाजी बाजारामध्ये आला. आज भाजी खरेदी करण्यासाठी दादर बाजारात लोकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. तर नागपुरात मागील तीन दिवसांत 2 हजारांच्यावर कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. मागील काही दिवसात नागपूरमध्ये रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याने अशंत: टाळेबंदीच्या पर्यायानंतर आता कडक टाळेबंदी घोषित करण्यात आली आहे. परंतु, दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात रस्त्यावर लोकांची गर्दी दिसली, मात्र दुपारनंतर अनेक ठिकाणी गर्दी कमी झाल्याचे चित्र दिसून आले.

यवतमाळमध्ये चाचणी केलेल्यांनीच दुकान उघडावे

जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांचा दर वाढतच चाललेला आहे. यवतमाळ शहरासह इतर तालुक्यातही रुग्ण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळेच छोटे-मोठे व्यावसायिक, दुकानदार, चहाटपरी, उपहारगृह, पानटपरी यासह इतर दुकानदारांना कोविडची तपासणी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. ज्यांच्याकडे तपासणी केल्याचे प्रमाणपत्र आहे, त्यांनाच दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. तपासणी करणार नाही, तोपर्यंत दुकाने सील करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार कुणाल झाल्टे यांनी दिली आहे.

जळगावातील कोविड केंद्राममधून रुग्णांचा काढता पाय

जळगावजिल्ह्यातील कोरोना संसर्गाची स्थिती चिंताजनक होत असताना आरोग्य यंत्रणेला कोणत्याही प्रकारचे सोयरसुतक नसल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. याचाच प्रत्यय जामनेरात आला आहे. जामनेर तालुक्यातील पळासखेडा येथील धारिवाल पॉलिटेक्निक महाविद्यालयामध्ये उभारलेल्या शासकीय कोविड केंद्रामध्ये रुग्णांना आवश्यक सोयीसुविधा मिळत नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या 50 पैकी 15 रुग्णांनी कोविड केंद्राममधून काढता पाय घेतला.

नाथषष्ठी यात्रा यावर्षी रद्द

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग प्रचंड प्रमाणात वाढल्याने राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यावर अगोदरच बंदी करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर पैठण येतील दरवर्षी भरणारी नाथषष्ठी यात्रा यावर्षी रद्द करण्यात आली असल्याची माहिती अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण एका पत्रकाद्वारे दिली. मात्र, मंदिरामध्ये पारंपरिक पूजाअर्चा होणार आहे. गेल्या चारशे वर्षांची परंपरा लाभलेले नाथषष्ठी यात्रा महोत्सव कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आली आहे. ही यात्रा रद्द होण्याचे हे सलग दुसरे वर्ष आहे. याबाबत आज सोमवारी जिल्हा प्रशासनाने अधिसूचना जाहीर केली असून सोहळ्याचे यंदा 423 वे वर्ष होते.

टाळेबंदी नकोच

बीड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी टाळेबंदी नकोच, असा सूर व्यापाऱ्यांचा व सर्वसामान्य नागरिकांचा आहे. बीड जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह सक्रिय रुग्णांची संख्या 550 आहे. आतापर्यंत कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 18 हजार 984 इतकी झालेली आहे. आरोग्य प्रशासनाने तपासणी वाढवली आहे. एकंदरीत या सगळ्या परिस्थितीमध्ये प्रशासन टाळेबंदी करण्याच्या तयारीत आहे. याचाच एक भाग म्हणून सायंकाळी सात ते सकाळी सातपर्यंत आस्थापने बंद ठेवण्याचा निर्णय बीड जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे.

पळून जाणारी तरुणी अडकली

तसेच पुण्यातही दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. यासाठी महापालिका प्रशासनाने जोरदार तयारी केली असून शहरात अनेक ठिकाणी कोरोना केंद्र उभारली आहेत. नव्याने पॉझिटीव्ह सापडणाऱ्या रुग्णांना या केंद्रांमध्ये ठेवण्यात येत आहे. परंतु, यातील काही रुग्ण विलगीकरणामधून पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. सोमवारी सायंकाळी असाच एक प्रकार उघडकीस आला असून केंद्रामधून पळून जाण्याचा प्रयत्न करणार्‍या एका 18 वर्षीय तरुणीसोबत असे काही घडले की नंतर अग्निशमन दलाला पाचारण करावे लागले. ही तरुणी खिडकीतून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना खिडकीत अडकली त्यानंतर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी या मुलीची सुटका केली.

हेही वाचा -मनसुख हिरेन प्रकरणाचे धागेदोरे 'मातोश्री'वर, खा. नवनीत राणांचा गंभीर आरोप

हेही वाचा -वाझे प्रकरणामुळे महाविकास आघाडी अडचणीत! सत्ताधारी सावध भूमिकेत

हेही वाचा -...तर संघर्ष अटळ! वीज बिलाच्या मुद्द्यावरून उदयनराजेंचा इशारा

ABOUT THE AUTHOR

...view details