मुंबई -परतीच्या पावसामुळे राज्यातील अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना फटका बसला आहे. यामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्राला भरीव आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. ते येथे बोलत होते.
केंद्र सरकारने महाराष्ट्राला भरीव आर्थिक मदत द्यावी- बाळासाहेब थोरात - balasaheb thorat demand
केंद्र सरकारने राज्याला भरीव मदत देण्याची आवश्यकता आहे, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.
ते म्हणाले, मान्सूनने यावर्षी आधी विदर्भात पूरस्थिती निर्माण केली होती. तर आता परतीच्या पावसाचाही मोठा फटका सोलापूर, उस्मानाबाद, पुणे, सांगलीसह राज्याच्या इतर भागालाही बसला आहे. अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील उभी पिकेही वाया गेली आहेत. या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी राज्य सरकार शेतकऱ्यांचा पाठीशी खंबीरपणे उभे आहे. नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत. यासोबतच राज्य सरकार केंद्र सरकारकडे मदतीसाठी प्रस्ताव पाठवेल. मात्र, केंद्र सरकारनेही त्यासाठी भरीव आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
केंद्र सरकारने राज्याला भरीव मदत देण्याची आवश्यकता आहे. आतापर्यंतचा अनुभव पाहता केंद्राकडून तुटपुंजी मदतच केली गेली आहे. आता तर राज्य सरकारसमोर कोरोना संकटामुळे मोठ्या आर्थिक अडचणी आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करुन राज्याला जास्तीत जास्त मदत मिळावी, यासाठी प्रयत्न करतील असेही थोरात म्हणाले.