महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 12, 2021, 1:40 AM IST

ETV Bharat / state

शिवजंयती साधेपणाने साजरी करा; राज्य सरकारचे नागरिकांना आवाहन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतर सण-उत्सवांप्रमाणेच यंदाची शिवजयंती साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे. त्यानुसार सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून गर्दीचे कार्यक्रम, मिरवणूक, बाईक रॅलीला मनाई करण्यात आली आहे.

शिवजंयती राज्य सरकार आवाहन
Shiv Jayanti celebration

मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतर सण-उत्सवांप्रमाणेच यंदाची शिवजयंती साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे. त्यानुसार सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून गर्दीचे कार्यक्रम, मिरवणूक, बाईक रॅलीला मनाई करण्यात आली आहे.

हेही वाचा -रेल्वे ठप्प झाल्यास एमटीआरसी प्राणालीतून प्रवाशांना मिळणार रियल टाइम माहिती

आनंदावर विरजण

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत आहे. टप्पा-टप्प्याने निर्बंध शिथील होत असून अनलॉकची प्रक्रियाही वेग घेत आहे. १९ फेब्रुवारीला शिवजयंती उत्सव साजरा केला जाणार आहे. शासन स्तरावर, विविध प्राधिकरणे, अनेक संस्था, संघटनांकडून तारखेनुसार शिवजंयती केली जाते. तर, तिथीनुसार विविध हिंदुत्ववादी संघटनांसह शिवसेनेकडून जयंती साजरी करण्यात येते. सध्या कोरोनाचा प्रसार कमी झाला आहे. रुग्णसंख्येतही कमालीची घट झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवजंयती उत्साहात साजरी केली जाईल, असे बोलले जात होते. मात्र, राज्य सरकारने कोरोनाविषयक उपाययोजनांना २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे, शिवजयंतीवरही निर्बंध आले आहेत. सरकारने या संबंधीच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यामुळे, शिवजंयती साजरी करणाऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे.

अशा आहेत सूचना -

- अनेक शिवप्रेमी किल्ला शिवनेरी अथवा गड/किल्ल्यांवर जाऊन एकत्रितपणे शिवजंयती साजरी करतात. परंतु, कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गर्दी टाळण्याचे आणि साधेपणाने शिवजयंती उत्सव साजरा करण्याचे आवाहन शासनाने केले आहे.

- दरवर्षी शिवजयंती साजरी करताना संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु, यावर्षी कोणत्याही प्रकारे सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक इत्यादींचे सादरीकरण अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये. त्याऐवजी केबल नेटवर्क अथवा ऑनलाईन प्रक्षेपण उपलब्ध करून देण्याबाबत व्यवस्था करावी.

- कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी, बाइक रॅली, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करावा. त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून फक्त १० व्यक्तींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

- आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करताना त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग, तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर इत्यादी) पाळावे.

- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग, तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरू होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे, असे आवाहन राज्य शासनाने केले आहे.

हेही वाचा -राज्यपालांच्या सचिवांनी माहिती दडवल्याने खोळंबा; राज्य सरकारचे स्पष्टीकरण

ABOUT THE AUTHOR

...view details