मुंबई -एखाद्या ग्राहकाने घरनोंदणी रद्द केल्यानंतर बिल्डरांकडुन टोकन रक्कम वा अनामत रक्कम कापून घेतली जाते. त्यामुळे ग्राहकाला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. अशी रक्कम कापण्याची कोणतीही तरतूद कायद्यात नव्हती, तर नव्या रेरा कायद्यातही अशी तरतूद नाही. त्यामूळे आतापर्यंत बिल्डर मनमानीपणे ग्राहकांची फसवणूक करत आले आहेत. मात्र, यापुढे ग्राहकाने भरलेली संपूर्ण रक्कम परत करण्याचे आदेश महारेराने दिले आहेत. हा सर्व बिल्डरासाठी मोठा दणका मानला जात आहे.
सुमित मुखर्जी आणि आशुतोष मुखर्जी या दोन ग्राहकांनी महारेराकडे राजसंकेत रियल्टी या बिल्डरविरोधात एक तक्रार दाखल केली होती. त्यानुसार त्यांनी 1 जुलै 2016 मध्ये या बिल्डरच्या मालाडच्या प्रकल्पात घर नोंदणी केली. 2 कोटी 23 लाख किंमतीच्या या घरासाठी त्यांनी 20 लाख रुपये टोकन-अनामत रक्कम भरली. पण काही कारणाने त्यांना ही घरनोंदणी 40 दिवसांतच रद्द करावी लागली. त्यामुळे त्यांनी बिल्डरकडे भरलेली रक्कम परत मागितली. पण बिल्डरने ही रक्कम परत देण्यास नकार दिला.