मुंबई - एखाद्याने रस्ता, पदपथ व्यापरल्यास त्याच्यावर महापालिकेकडून कारवाई केली जाते. कुलाबा येथील पंचतारांकित ताज पॅलेस हॉटेलकडून पालिकेच्या रस्ते व पदपथावर कब्जा केला आहे. त्यानंतरही पालिकेने या हॉटेलला पदपथ वापरण्यासाठी शंभर टक्के तर रस्ते वापरण्यासाठी 50 टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. पादचाऱ्यांना या मार्गावरुन फिरण्यात मनाई करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे. यावरुन वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ताजवर दहशतवादी हल्ला
देशातील पंचतारांकित हॉटेलपैकी एक असलेल्या मुंबईतील ताज हॉटेलमध्ये जाण्याची प्रत्येकाची इच्छा असते. गेट वे ऑफ इंडियाच्या दर्शनी भागात हे हॉटेल आहे. देशभरासह राज्याच्या कोनाकोपऱ्यातून मुंबईत आलेले पर्यटक येथे भेटी देत असतात. सर्व सामान्य नागरीक सेल्फी काढून आपली इच्छा पूर्ण करतात. 26 नोव्हेंबर, 2008 ला या हॉटेलवर दहशतवादी हल्ला झाला होता. परदेशी पाहुण्यांचे वास्तव्य असल्याने दहशतवाद्यांनी हे हॉटेल निवडले होते. यात 31 जणांचा मृत्यू झाला होता.
शुल्क वसूल करण्याचे निर्देश
पोलिसांच्या निर्देशानुसार येथे सुरक्षेचा उपाय म्हणून रस्ते बंदिस्त केले. रस्त्यांवर झाडांच्या कुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. अतिरेकी हल्ले टाळण्यासाठी उपाययोजना असल्याचे हॉटेल प्रशासनाचे म्हणणे होते. पण, हॉटेलच्या सभोवताली असलेले पी.जे.रामचंदनी मार्ग, बेस्ट मार्ग, बी.के. बोमन बेहराम मार्ग आणि महाकवी भूषण मार्गावरील रस्त्यांवरही कुंड्या ठेवल्या आहेत. एकूण 869 चौ.मीटरची जागा यामुळे व्यापली आहे. 9 जून, 2015 मध्ये तत्कालीन महापालिका आयुक्तांनी येथील रस्ते व पदपथाचे आवश्यक ते शुल्क वसूल करावे, असे निर्देश प्रशासनाला दिले होते.