मुंबई : मुंबई महानगरातील समुद्रकिनारी व चौपाट्यांवर नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये फिरण्यासाठी व पोहण्यासाठी जात असतात. याबाबत मुंबई महापालिकेच्या वतीने सातत्याने जनजागृती करून नागरिकांना पोहण्यासाठी किंवा इतर कुठल्याही कारणासाठी समुद्रात शिरु नये असे बजावूनसुद्धा काही नागरिक समुद्रात जातात. प्रसंगी बुडण्याच्या अप्रिय घटना घडतात. अशा पद्धतीच्या घटना घडू नयेत तसेच नागरिकांची सुरक्षितता करण्याच्या उद्देशाने मुंबईतील सहा चौपाट्यांवर १२० प्रशिक्षित सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्याचे आदेश, मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत. परंतु याचसोबत अनेक वर्षापासून कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या जीव रक्षकांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घ्यावे, ही मागणी सुद्धा वाढत आहे.
चौपाट्यांवर नागरिक व पर्यटकांची गर्दी: मुंबईला अरबी समुद्राचा १४५ किलोमीटर लांबीचा किनारा लाभला आहे. हा समुद्र किनारा कुलाबा येथून सुरू होऊन गोराई आणि तिथून पुढे मुंबई महानगर प्रदेशात पसरलेला आहे. त्यात मुंबईत सहा चौपाट्या उपलब्ध आहेत. या चौपाट्यांवर नागरिक व पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. विशेषतः समुद्रात पोहण्यासाठी नागरिक, पर्यटकांची ओढ जास्त असते. नियम धाब्यावर बसवून ते पोहण्यासाठी समुद्रात उतरतात व कधी कधी हेच त्यांच्या जीवावर बेतते. याच कारणासाठी अशा पद्धतीच्या घटना रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने मुंबईतील सहा चौपाट्यांवर १२० सुरक्षा रक्षक तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मुंबईतील जीव रक्षकांची संख्या जरी वाढणार असेली तरीसुद्धा अनेक वर्षापासून कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या जीव रक्षकांना कायमस्वरूपी नोकरीत समावेश करून घ्यावे, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.
मुंबईत सहा चौपाट्या : मुंबईतील दादर आणि गिरगाव या चौपाट्या मुंबई शहर विभागामध्ये येतात. तसेच वर्सोवा, आक्सा, गोराई, जुहू या चौपाट्या पश्चिम उपनगरात असून जुहू बीच सुद्धा फार धोकादायक आहे. या सर्व चौपाटीच्या ठिकाणी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेदरम्यान ६० प्रशिक्षित सुरक्षा रक्षक तैनात असतील. तसेच दुपारी ३ ते रात्री ११ वाजेदरम्यान ६० प्रशिक्षित सुरक्षा रक्षक कार्यरत राहणार असल्याची माहिती, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिली आहे. हे सुरक्षा रक्षक पूर बचावाचे प्रशिक्षण घेतलेले तसेच शहर आपत्ती प्रतिसाद पथकातील असणार आहेत.