मुंबई - गेल्या काही दिवसात तापमान वाढले आहे. उष्माघाताने महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात १४ जणांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी राज्यातील शाळा आज २१ एप्रिलपासून बंद केल्या आहेत. त्यानंतरही पालिकेने ऐन उन्हाळ्यात २५ ते २७ एप्रिल दरम्यान पहिलीमध्ये प्रवेश घेतलेल्या मुलांसाठी शाळापूर्व तयारी अभियान अंतर्गत 'पहिले पाऊल' उपक्रम राबविण्यात आला आहे. यामुळे पालिकेच्या कारभारावर प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहे.
'पहिले पाऊल' उपक्रम -स्ट्रेंथनिंग टीचिंग-लर्निंग अँड रिझल्ट्स फॉर स्टेटस प्रोजेक्ट अंतर्गत इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेतलेल्या मुलांसाठी शाळापूर्व तयारी अभियान अंतर्गत 'पहिले पाऊल' उपक्रम अंतर्गत प्रत्येक शाळेच्या आवारात अथवा गावात मुलांच्या शाळापूर्व तयारीसाठी मेळाव्यांचे आयोजन केले जाते. पुणे येथील राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद आणि मुंबई प्रादेशिक विद्या प्राधिकरणाच्या वतीने यापूर्वी एप्रिल आणि जून २०२२ मध्ये स्टार्स प्रकल्प अंतर्गत शाळापूर्व तयारीसाठी प्रत्येक शाळांच्या आवारात तसेच गावांमध्ये मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यांमध्ये वाडी-वस्तीवर राहणाऱ्या माता-पालकांचे गट तयार करुन त्यांना मार्गदर्शन करून साहित्य पुरविण्यात आले. या अभियानात त्यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिकेत एक लाखाहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले. तसेच माता पालकांचे गटही स्थापन झाले होते.
२५ ते २७ एप्रिल उपक्रम - याच पार्श्वभूमीवर २५ एप्रिल २०२३ रोजी महाराष्ट्र शासनाकडून वरळी सीफेस मनपा शाळा येथे प्रातिनिधिक स्वरुपात शाळापूर्व तयारी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. तर २६ एप्रिल २०२३ रोजी बृहन्मुंबई महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. या मेळाव्यास शालेय शिक्षण सचिव रणजीत सिंह देओल, राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्यासह शिक्षण विभागाचे संबंधित अधिकारी, माता पालक गटांचे प्रतिनिधी, प्रथम संस्थेचे प्रतिनिधी, राजकिय नेते तसेच स्थानिक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. सदर मेळाव्यास पर्यवेक्षीय यंत्रणा स्थानिक प्रतिनिधी भेटी देणार आहेत.