मुंबई -मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु असून रोज सुमारे हजार रुग्ण नवे आढळून येत आहेत. ज्या विभागात कोरोनाचा प्रसार होत आहे, अशा भागात मुंबईकर नियम धाब्यावर बसवत असल्याचे समोर आले आहे. मास्क न लावता घराबाहेर पडणाऱ्या ६८ जणांवर कारवाई करत ६८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर ३१३ जणांना समज देऊन सोडून देण्यात आले आहे.
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचे रुग्ण मुंबईतही आढळून आल्याने २४ मार्च पासून लॉकडाऊन सुरू आहे. महिनाभरपूर्वी मिशन बिगीन अगेन अंतर्गत अनलॉक करताना नागरिकांना कामानिमित्त घराबाहेर पडण्याची, जॉगिंग, वॉकिंग आदीसाठी सूट देण्यात आली. अशी सूट देताना घराबाहेर पडल्यावर मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे असे नियम घालून देण्यात आले आहेत.
मुंबईत सध्या अंधेरी ते दहिसर आणि भांडुप, मुलुंड, ग्रॅंटरोड या भागात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत.त्यासाठी या विभागात पालिका आणि पोलिसांकडून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी केली जात आहे. मात्र, त्यानंतरही मास्क न घालता नियम धाब्यावर बसवले जात आहेत. अशा नियम धाब्यावर बसवणाऱ्या ६८ जणांकडून ६८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर ३१३ लोकांना समज देऊन सोडून देण्यात आले आहे.
विशेष म्हणजे कोरोनाचे रुग्ण ज्या विभागात मोठ्या संख्येने आढळून येत आहेत अशा अंधेरी पूर्व, मालाड, कांदिवली, दहिसर, बोरिवली, मुलंड या भागांतूनच दंडवसुली झाली आहे. ३० जूनला ३५ लोकांकडून ३५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला, तर १ जुलै रोजी १६ जणांकडून १६ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
गेल्या तीन दिवसांत सर्वाधिक दंडवसुली कांदिवलीतून ३५ हजार इतकी झाली, तर त्यापाठोपाठ अंधेरी पूर्वमधून ११ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तर ३१३ लोकांना समज देऊन सोडण्यात आले आहे. त्यापैकी अंधेरी पूर्वमधून १०५ लोकांना, तर मुलुंडमध्ये ८३ लोकांना समज देऊन सोडण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.