मुंबई: गेल्या पंचवीस वर्षांपासून मित्रपक्ष असलेल्या शिवसेना-भाजपमध्ये 2014 नंतर दरी निर्माण झाली. 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने अजित पवार यांना सोबत घेऊन सरकार स्थापन केले. शिवसेनेने भाजपला प्रत्युत्तर देण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कट्टर विरोधक असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत हात मिळवणी करत महाविकास आघाडी केली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये मतभेद वाढले. शरद पवारांनी 'लोक माझे सांगाती' या पुस्तकातून महाविकास आघाडीचा जन्म, शिवसेना-भाजपमधील संघर्षावर भाष्य केले आहे. भाजपने राबवलेल्या 'ऑपरेशन लोटस'वर हल्लाबोल करताना, शिवसेना संपवण्यासाठी आणि स्वबळावर सत्ता मिळवण्यासाठी भाजपने केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख पुस्तकात केला आहे.
भाजपला शिवसेनेची अडचण:कट्टर हिंदुत्ववादी पक्ष म्हणून भाजपला शिवसेनेची अडचण होत होती. महाराष्ट्रात शिवसेनेची मोठी ताकद आहे. शहरी, ग्रामीण भागातून तिचे उच्चाटन केल्याशिवाय राज्यात निर्विवाद वर्चस्व मिळवता येणार नाही. त्यासाठी शिवसेना संपवल्याशिवाय स्वबळावर सत्ता येणार नाही, असा चंग भाजपकडून बांधण्यात आला. 2014 साली नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर शिवसेनेला 'डॅमेज' करण्याचा वारंवार प्रयत्न झाला. पुढे पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना शिवसेनेबाबत बिलकुल सहानुभूती उरली नव्हती. त्यामुळे विधानसभा, लोकसभेच्या निवडणुकीच्या जागा वाटपांपासून स्वबळावर बहुमत मिळवण्यासाठी भाजपने खटाटोप केली. शिवसेनेच्या दृष्टीने गद्दार असलेले नारायण राणे यांना भाजपमध्ये विलीन करून शिवसेनेच्या जखमेवर मीठ चोळले, असा दावा या पुस्तकातून करण्यात आला आहे.