महाराष्ट्र

maharashtra

युतीच्या जागा वाटपात नामोल्लेख नसल्याने आठवले गटात अवस्थता

भाजपमधील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आठवले यांना भाजपकडून मुंबई ऐवजी सोलापूर येथील जागा दिली जाऊ शकते.

By

Published : Feb 20, 2019, 2:21 PM IST

Published : Feb 20, 2019, 2:21 PM IST

रामदास आठवले

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सेना-भाजपची युती आणि त्यासाठी जागा वाटपही निश्चित झाले. त्यात २०१२पासून सेना-भाजपसोबत असलेल्या आठवले यांच्या रिपाइं गटाचा दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी साधा नामोल्लेखही केला नाही. यामुळे आठवले गटात प्रचंड अस्वस्थता वाढली आहे. त्यातच मंगळवारी आठवले यांनी आपल्याला एक तरी जागा द्यावी, अशी मागणी करुन भाजपसमोर रिपाइंची लाचारी स्पष्ट केली.

RAMDAS AATHWALE

भाजपच्या जोरावर राज्यसभेत गेलेले आणि पुढे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री आठवले सध्या भाजपच्या दृष्टीने वळचणीला पडले की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील विधानसभा, लोकसभा निवडणुकीत कायम आठवले यांना सोबत ठेवणाऱ्या भाजपने युतीची घोषणा करताना आठवले यांच्या पक्षाचा नामोल्लेखही केला नाही. त्यामुळे आठवले यांनी भाजपकडे एका जागेसाठी आपली आगतिकता व्यक्त केली. युतीच्या जागावाटपात भाजपच्या वाट्याला आलेल्या २५ जागांपैकी १ जागा भाजपकडून आपल्याला मिळेल, अशी अपेक्षा आठवले यांना आहे.

मागील काही माहिन्यांपासून आठवले मुंबईतील दक्षिण मुंबईची जागा मागत आहेत. मात्र, ही जागा युतीच्या जागा वाटपात शिवसेनेला जाणार असल्याने आठवले यांची येथेही कोंडी होणार आहे. त्यासाठी आठवले यांनी काही दिवसांपूर्वी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना शिवसेनेला पालघरच्या जागेच्या बदल्यात दक्षिण मुंबईची जागा द्यावी, अशी गळ घातली होती. मात्र, त्यावर कोणी दाद दिली नसल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपमधील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आठवले यांना भाजपकडून मुंबई ऐवजी सोलापूर येथील जागा दिली जाऊ शकते. मात्र, त्या जागेवर आठवले इच्छुक नसल्याने पुन्हा एकदा आठवले यांना साताऱ्याची जिंकून न येणारी जागा ऐनवेळी दिली जाण्याची शक्यता आहे.

सेना-भाजपच्या युतीनंतर आठवले यांच्या नावाचाही उल्लेख करण्यात आला नसल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. आमच्याच बळावर शिवसेना २०१२ मध्ये काठावर मुंबई महापालिकेत सत्तेवर आली. त्यावेळी शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग केला होता. याच दरम्यान मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सेनेला मनसेने जोरदार धक्का दिला असता, परंतु सेनेला भीमशक्तीने सावरले. शिवाय २०१४ मध्ये दोन्हीही पक्षाच्या उमेदवारांना लोकसभेत निवडून आणण्यासाठी मोठी मदत झाल्याचे आठवले गटाचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. आंबेडकरी कार्यकर्ते संजय जाधव म्हणाले, की युती होताना आठवले यांचा साधा उल्लेख न करणे हा त्यांचा अवमान आहे. यामुळे राज्यातील आंबेडकरी समाजात नाराजी पसरली आहे. आठवले यांनी आता युतीत न जाता पुन्हा एकदा राज्यात रिपाइं पक्षांचे एकीकरण करण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि यावेळी वंचित बहुजन आघाडीत येऊन आपली ताकत दाखवावी.

ABOUT THE AUTHOR

...view details