मुंबई- 'आंदोलनजीवी' असे म्हणत आंदोलन करणाऱ्यांना हिणवणे योग्य नाही. खरंतर प्रत्येक लहान-सहान गोष्टींवर हंडे आणि बांगड्या घेऊन भाजपनेसुद्धा आंदोलने केली आहेत. त्यामुळे 'आंदोलनजीवी' कोण हे ठरवायचे झाले, तर काटा हा भाजपकडेच झूकतो, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे.
आपल्या देशाला आंदोलने नवीन नाहीत -
आज जगभर आंदोलने होत आहेत. तसेच आपल्या देशालाही आंदोलने नवीन नाहीत. भाजप सत्तेत नव्हती, त्यावेळी रोज काही ना काही असायचे, कुठे बांगड्या घेऊन जाणे, कुठे रिकामे हंडे घेऊन जाणे, रस्त्यातच बसणे अशा वेगवेगळ्या पध्दतीने आंदोलने केली जात होती. सभागृहातही त्यांनी आंदोलने केली. याची आठवणही छगन भुजबळ यांनी यावेळी करून दिली. लोकशाहीमध्ये एखादा मुद्दा किंवा सरकारने घेतलेला निर्णय मान्य नसेल, तर पत्र पाठवायचे, निषेध व्यक्त करायचा, आंदोलन करायचे असते मग याव्यतिरिक्त आणखी दुसरे काय करायचे, असा प्रश्नही छगन भुजबळ यांनी विचारला.
अमित शाह यांच्या वक्तव्याचा घेतला समाचार -
गृहमंत्री अमित शहा यांनी सिंधुदुर्गात भाषणात करताना, 'आपण बंद दाराआड काहीही करत नाही, जे काही करतो ते छाती ठोकून करतो', असे वक्तव्य करत उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीका केली होती. मात्र, मग रात्रीतून लोक उठायच्या आधी देवेंद्र फडणवीसांचा जो शपथविधी पार पडला, तो काय होता, असा प्रश्नही त्यांनी यावेळी विचारला.