महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 17, 2020, 3:05 AM IST

ETV Bharat / state

चेतन चौहान यांच्या निधनामुळे क्रिकेट विश्वाचे नुकसान- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

भारताचे माजी कसोटीपटू आणि उत्तर प्रदेश सरकारमधील कॅबिनेट मंत्री चेतन चौहान यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शोक व्यक्त केला आहे. चौहान यांच्या निधनामुळे क्रिकेट विश्वासह समाजाचे नुकसान झाले आहे, अशा भावना राज्यपालांनी व्यक्त केल्या आहेत.

chetan chauhan
चेतन चौहान

मुंबई- प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू व उत्तर प्रदेश सरकारमधील कॅबिनेट मंत्री चेतन चौहान यांच्या निधनाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दुःख व्यक्त केले आहे.चेतन चौहान माझे घनिष्ट स्नेही होते. त्यांच्या निधनामुळे क्रिकेट विश्वाचे तसेच एकूण समाजाचे नुकसान झाले आहे. त्यांच्या निधनाबद्दल शोक संवेदना त्यांच्या कुटुंबियांना कळवित आहे, असे राज्यपाल कोश्यारी यांनी त्यांच्या संदेशामध्ये म्हटले आहे.

चेतन चौहान हे देशातील एक उत्तम क्रिकेटपटू व क्रिकेट प्रशासक होते. ते उत्तम समाजसेवक देखील होते. लोकसभा सदस्य तसेच उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले, अशा भावना राज्यपाल कोश्यारी यांनी व्यक्त केल्या.

दरम्यान, चेतन चौहान यांनी १९६९ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. लिटल मास्टर सुनील गावस्कर यांच्यासोबत त्यांनी भारतासाठी सलामीवीराची भूमिका पार पाडली.चौहान यांनी भारताकडून ४० कसोटी आणि ७ एकदिवसीय सामने खेळले आहेत. १९८१ मध्ये त्यांना अर्जुन पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते. चेतन चौहान यांचे शिक्षण पुण्यामध्ये झाले होते त्यांनी महाराष्ट्राच्या संघाकडून रणजी सामने खेळले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details