महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 10, 2020, 10:38 PM IST

Updated : Sep 11, 2020, 12:19 AM IST

ETV Bharat / state

'बजाज फायनान्स'ला मनसेचा दणका, १ लाख १९ हजार ७४३ रिक्षामालकांना आर्थिक दिलासा

टाळेबंदीत रिक्षाचे थकीत हप्ते, बाऊन्स झालेले चेक यामुळे ठोठावला जाणारा दंड मनसेच्या मागणीमुळे बजाज फायनान्सने माफ केला आहे. यामुळे राज्यातील १ लाख १९ हजार ७४३ रिक्षामालकांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.

मनसे
मनसे

मुंबई - केंद्र सरकार तसेच राज्य सरकारने कोरोनामुळे निर्माण जालेल्या आर्थिक संकटात रिक्षाचालकांना कोणताही आर्थिक दिलासा दिलेला नसतानाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दणक्यामुळे बजाज फायनान्सला आपल्या १ लाख १९ हजार ७४३ रिक्षा कर्ज ग्राहकांना आर्थिक दिलासा देण्याचा निर्णय घेणे भाग पडले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनी मुंबईत ‘महाराष्ट्र गड’ येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

बोलताना मनसेचे सरचिटणीस
टाळेबंदीच्या कठोर अंमलबजावणीमुळे राज्यातील रिक्षा मालकांना पाच महिने कोणत्याही प्रकारचे आर्थिक उत्पन्न मिळत नव्हते. अशा स्थितीत रिक्षासाठी त्यांनी घेतलेल्या कर्जाचे मासिक हप्ते भरण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जात होता. अशा आशयाच्या अनेक तक्रारी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेकडे आल्या होत्या.

याबाबत बजाज कंपनीकडून रिक्षा कर्ज ग्राहकांना सहकार्य व्हावे, यासाठी मनसेने आधी बजाज कंपनीशी पत्रव्यवहार केला. त्यानंतर गोरेगाव येथील बजाज फायनान्सच्या कार्यालयावर धडक देऊन रोखठोक इशारा दिला. यानंतर बजाज फायनान्सचे वरिष्ठ अधिकारी आणि मनेसेचे संजय नाईक, कीर्तिकुमार शिंदे यांच्यात चर्चेच्या दोन फेऱ्या झाल्या. या चर्चेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुचवलेली योजना बजाज फायनान्सने मान्य केली. काल (बुधवार) संध्याकाळी उशीरा कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योजनेचे लेखी पत्र मनसेला दिले. यामुळे रिक्षा मालकांना टाळेबंदीच्या काळात थकलेले हप्ते व बाऊन्स झालेले चेक यावरचा दंड तसेच हप्ता उशीरा भरल्याचा दंड बजाज कंपनीने माफ केले आहे. याचा महाराष्ट्रातील सुमारे १ लाख १९ हजार ७४३ रिक्षाचालकांना होणार आहे.

यानुसार राज्यातील १ लाख १९ हजार ७४३ रिक्षा मालकांची प्रत्येकी किमान ३ हजार २०० रुपये ते जास्तीत जास्त ४ हजार रुपये इतकी बचत होणार आहे. तसेच त्यापोटी बजाज फायनान्सला किमान ३८ कोटी ते कमाल ४७ कोटी इतक्या निधीवर पाणी सोडावे लागणार आहे.


असा मिळणार दिलासा

  • मार्च २०२० ते आगस्ट २०२० या कालावधीत आकारण्यात आलेले धनादेश ईसीएस अनादरीत झालेले शुल्क (बाऊन्स चार्जेस) आणि इतर थकीत शुल्क (अदर ओव्हरड्यू चार्जेस) यांच्या एकूण रकमेपैकी ५० टक्के रक्कम ३० सप्टेंबर २०२० रोजी किंवा त्यापूर्वी माफ केले जाईल.
  • ग्राहकाने सप्टेंबर, आक्टोबर आणि नोव्हेंबर २०२० या महिन्यात कर्जाच्या हप्त्याच्या तारखेला किंवा त्याआधी ईएमआय भरणा केल्यास उर्वरित थकीत शुल्काची ५० टक्के रक्कम माफ केली जाईल. डिसेंबर २०२०च्या महिन्यात संबंधित कर्ज खात्यात हे दिसून येईल.
  • बजाज ऑटो फायनान्सच्या मुंबई आणि ठाणे ग्राहकांसाठी सप्टेंबर २०२०च्या महिन्यासाठी आकारण्यात येणारे धनादेश-ईसीएस अनादरित झालेले शुल्क (बाऊन्स चार्जेस) माफ केले जाईल.
  • वरील बाबींचा फायदा बजाज ऑटो फायनान्सच्या सुमारे १ लाख १९ हजार ७४३ ग्राहकांना होईल.
  • फेब्रुवारी २०२०पर्यंत थकबाकी न ठेवता, ज्या ग्राहकांनी मोरॅटोरिअम पॉलिसीचा लाभ घेतलेला आहे, अशा ग्राहकांनाच महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या आग्रहावरुन बजाज फायनान्सने ही विशेष सवलत दिली आहे.

हेही वाचा -कंगना हा विषय आमच्यासाठी संपला - संजय राऊत

Last Updated : Sep 11, 2020, 12:19 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details