मुंबई - राज्यात लोकसभेच्या मतदानानंतर स्ट्राँग रूममध्ये ईव्हीएम मशीन ठेवण्यात आल्या आहेत. त्या रूमच्या परिसरात जॅमर बसवा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे.
काँग्रेस पक्षाच्या शिष्ठमंडळाने मुख्य निवडणूक अधिकारी अश्विनी कुमार यांची भेट घेतली. या शिष्ठमंडळात नसीम खान, भाई जगताप, बाबा सिद्दीकी यांचा समावेश होता. त्यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत चव्हाण यांनी ही मागणी केली.
आम्ही आज आयोगाच्या घेतलेल्या भेटीत ईव्हीएम संदर्भात जी खबरदारी घेण्याची गरज आहे यासंदर्भात लक्ष वेधले. निवडणुकीतील ईव्हीएम मशीनला टॅप्मरिंग होऊ नये, यासाठी उपाययोजना सांगितल्या. स्ट्राँग रूमला बाहेरून कोणतीही टॅम्परिंग होऊ नये, यासाठी हे जॅमर लावावेत, असे सांगितले आहे. त्यासोबत मतमोजणीच्या प्रत्येक राऊंडच्या मतमोजणीनंतर आरोच्या सहीनंतर जाहीर करावा. उमेदवाराला ज्या मशीन बद्दल आक्षेप आहे त्या उमेदवारच्या मागणीप्रमाणे या मशीन चेक करण्यात याव्यात, अशी मागणी आपण केली असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
रामटेक इथे स्ट्राँग रूममधून डीव्हीआर चोरीला गेला,अशी तक्रार आमच्याकडे आली.पण या घटनेनंतर निवडणूक आयोगाने काही केले नाही. ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅट मशीनसंदर्भात किमान ५० टक्के मोजणी व्हावी. यादृच्छिक पद्धतीने मशीन चेक करण्यापेक्षा उमेदवारांनी केलेल्या मागणीप्रमाणे मशीन चेक व्हाव्यात. मतमोजणी करत असताना पहिला ते शेवटचा उमेदवार अशी मतमोजणी करतात. पण शेवटून वरपर्यंत मतमोजणी करावी, अशी मागणीही चव्हाण यांनी यावेळी केली.
दरम्यान,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा चव्हाण यांनी निषेध केला. प्रचारादरम्यान त्यांनी खालच्या पातळीवर जाऊन, असे विधान केले. लोकशाहीला घातक असे हे विधान आहे. पंतप्रधानांना पराभव आता दिसू लागला आहे. म्हणून ते अशी वक्तव्य करू लागले आहेत, अशी टीका त्यांनी केली. खालच्या पातळीवरची अलोचना करणे देशाच्या पंतप्रधानांना शोभत नसल्याचे त्यांनी म्हटले.
दुष्काळावर विचारले असता चव्हाण म्हणाले, की १० तारखेला काँग्रेसच्या सर्व नेत्यांची बैठक आहे. दोन सत्रात ही बैठक होणार असून दुष्काळ आणि विधानसभा या विषयावर बैठक घेण्यात येणार आहे. त्यावेळी यावर भूमिका जाहीर केली जाणार आहे. मराठा आरक्षणासाठी सरकारकडून केवळ निवडणुकीपर्यंतच आम्ही काही करत आहोत, असे भासवण्यात आले. पण सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणबद्दल काहीही केलेले नाही. म्हणूनच मराठा समाजातील मेडिकल विद्यार्थ्यांची ही परिस्थिती आली असल्याची टीका चव्हाण यांनी केली.