महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'मन की बात'मधून पंतप्रधानांनी कौतूक केलेल्या शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ ओढवणे लज्जास्पद - अशोक चव्हाण

राष्ट्रीय महामार्गात गेलेल्या जमिनीला योग्य मोबदला न मिळाल्यामुळे सोमवारी अकोला जिल्ह्यातील सहा शेतकऱ्यांनी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात विष प्राशन केले होते.

By

Published : Aug 6, 2019, 2:49 PM IST

अशोक चव्हाण

मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’मधून जाहीर कौतूक केलेले शेतकरी मुरलीधर राऊत यांच्यावर सरकारी अनास्थेमुळे आत्महत्येची वेळ यावी, हा प्रकार भाजप सरकारसाठी लज्जास्पद असल्याची संतप्त टीका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. यातून सरकारची शेतकऱ्यांप्रती निष्क्रियता आणि उदासीनता चव्हाट्यावर आल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.

राष्ट्रीय महामार्गात गेलेल्या जमिनीला योग्य मोबदला न मिळाल्यामुळे सोमवारी अकोला जिल्ह्यातील सहा शेतकऱ्यांनी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात विष प्राशन केले होते. या घटनेसंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना अशोक चव्हाण म्हणाले की, त्या सहा शेतकऱ्यांपैकी मुरलीधर राऊत यांचे अकोला-बाळापूर मार्गावर ‘मराठा’नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलवर रात्री ट्रॅव्हल्स जेवणासाठी थांबतात. नोटबंदीच्या काळात रोख रक्कमेची आणि सुट्या पैशांची मोठी अडचण निर्माण झाल्याने प्रवाशांकडे जेवायलाही पैसे नसायचे. त्या काळात मुरलीधर राऊत यांनी प्रवाशांसाठी विनाशुल्क जेवणाची व्यवस्था केली होती. सामाजिक जाणिवेतून त्यांनी केलेल्या या कामाचे खुद्द पंतप्रधानांनीच ‘मन की बात’मधून जाहीर कौतूक केले होते.

अशोक चव्हाण

मोदींनी प्रशंसोद्गार काढलेले राऊत यांच्या मालकीच्या ‘मराठा’ हॉटेलची जागा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणात संपादित झाली. त्या जागेला अतिशय अल्प मोबदला मिळाल्याने मुरलीधर राऊत सरकारकडे पाठपुरावा करीत होते. हीच तक्रार घेऊन इतरही अनेक शेतकरी सातत्याने प्रशासनाकडे दाद मागत होते. त्यामध्ये २०१७ मध्ये आत्महत्या करणारे शेतकरी भारत टकले यांची पत्नी अर्चना टकले यांचाही समावेश होता. त्यांनीही काल सरकारच्या अनास्थेला कंटाळून विष प्राशन केले आहे. गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्याशी लागेबांधे असलेल्या लोकांना घसघशीत मोबदला दिला जात असताना इतरांना तुटपुंजा मोबदला का? असा आरोप या प्रकरणात करण्यात आला होता.

यासंदर्भात बोलताना अशोक चव्हाण पुढे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा आज अकोला जिल्ह्यात दाखल होते आहे. मात्र, त्यापूर्वीच घडलेली ही घटना भाजप-शिवसेना सरकारच्या तमाम दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे. हे सरकार शेतकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण केल्याचा दावा करते. पण दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री जिल्ह्यात येत असताना या शेतकऱ्यांना त्यांच्याकडे दादही मागाविशी वाटू नये आणि त्यांनी हतबल होऊन आत्महत्येचा प्रयत्न करावा, यातून सरकारचा दावा फोल असल्याचे स्पष्ट होते. थोडी जरी संवेदना शिल्लक असेल तर मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रेत या शेतकऱ्यांची भेट घेऊन क्षमा मागावी आणि त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी देखील चव्हाण यांनी केली.

पंतप्रधानांनी जाहीर प्रशंसोद्गार काढलेल्या मुरलीधऱ राऊत यांच्यासारख्या शेतकऱ्याची भाजप सरकारच्या काळात दखल घेतली जात नाही. दीड वर्षांपूर्वी आत्महत्या करणाऱ्या भारत टकले यांच्या कुटुंबाला संपूर्ण आधार दिला जात नाही. उलट सरकारी अनास्थेमुळे त्यांच्या पत्नीवरही विष प्राशन करण्याची वेळ ओढवते, हे संतापदायक असल्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले.

धुळे जिल्ह्यातील आत्महत्या करणारे वयोवृद्ध शेतकरी धर्मा पाटील यांच्या प्रकरणाशी साधर्म्य असणारी ही घटना आहे. पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्याशी संबंधीत लोकांना भरीव मोबदला दिला जात असताना आपल्यावर मात्र सरकारने अन्याय केल्याचा आरोप धर्मा पाटील यांनी केला होता. अकोल्याच्या घटनेत देखील नेमका हाच प्रकार घडला आहे. याचाच अर्थ धर्मा पाटील यांच्या आत्महत्येतून सरकारने काहीच धडा घेतलेला नसल्याचे सिद्ध होते, असा आरोपही अशोक चव्हाण यांनी केला.

ABOUT THE AUTHOR

...view details