मुंबई - माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींच्या जाण्याने राजकारण आणि समाजकारणात मोठी पोकळी निर्माण झाल्याचे वक्तव्य शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी केले. जेटली यांनी एकाच वेळी कायदे आणि संविधानाचा अभ्यास केला. तर दुसरीकडे भ्रष्टाचार विरोधात लढाई लढली. आयुष्यभर ते अतिशय निष्कलंक जीवन जगल्याचे म्हणत शेलार यांनी जेटलींना आदरांजली वाहिली.
अरुण जेटली हे भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढाईत सातत्याने पुढे राहणारे नेते होते. त्यांनी संविधानाच्या अभ्यासामध्ये प्रावीण्य मिळवले. अडचणीच्या परिस्थितीत योग्य कायदेशीर मार्ग ते काढत असल्याचे शेलार म्हणाले.
राजकारणातून समाजकारण करणारे नेते - तावडे
अरुण जेटली हे राजकारणातून समाजकारण करणारे नेते होते. तब्बेतीकडे दुर्लक्ष करुन ते सातत्याने काम करत राहिले. कोणतीही गोष्ट करताना ते वैचारीकतेने करायचे. कोणतीही गोष्ट ते सहजतेने पटवून द्यायचे असे म्हणत मंत्री विनोद तावडेंनी अरुण जेटलींना आदरांजली वाहिली. ते आमचे मार्गदर्श होते. देश बदलाच्या मार्गावर असताना जेटलींचे जाणं व्यक्तिगत नुकसानाबरोबर देशाचेही नुकसान असल्याचे तावडे म्हणाले.
अभ्यासपूर्ण विषय मांडण्यात ख्याती असणारे नेते - गिरीष बापट
अरुण जेटली हे अभ्यासपूर्ण विषय मांडण्यात ख्याती असणारे नेते होते अशा शब्दात पुण्याचे खासदार गिरीष बापट यांनी जेटलींना आदरांजली वाहिली. संसदेतील अनेक त्यांची भाषणे प्रेरणा देणारी असल्याचे बापट म्हणाले. अनेक माझा आणि त्यांचा ३० ते ३५ वर्षाचा संबंध होता. महाविद्यालाच्या निवडणुका जिंकण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.
जेटलींच्या जाण्यानं पक्षाला धक्का - माधव भंडारी
अरुण जेटली भाजपचे थिंक टँक होते. त्यांच्या जाण्याने पक्षाला मोठा धक्का बसला असल्याचे वक्तव्य भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी केले. विद्यार्थी दशेच्या काळात त्यांनी दिवंगत इंदिरा गांधी यांची सत्ता हलवण्याचा प्रयत्न केला. आणीबाणीच्या काळात त्यांनी तुरुंगवास भोगला होता. ते पक्षाचे ऊर्जावान नेते होते.
विद्वत्ता असूनही नम्र असणारे व्यक्तिमत्व - चंद्रकांत पाटील
माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतत्र माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला धक्का बसला असून, भाजपला कोणाची नजर लागली का? असा प्रश्न पडतो अशा भावना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केल्या. अटल बिहारी वाजपेयी, सुषमा स्वराज, मनोहर पर्रीकर या सारखे मोठे नेते गेल्याने पक्षाचा मोठं नुकसान झाले आहे. अरुण जेटलीमध्ये प्रचंड विद्वत्ता असूनही ते नम्र होते. पक्ष आणि देशाप्रती आदर या सगळ्या गोष्टी जेटलीमध्ये होत्या. इतर पक्षाच्या नेत्यांसोबत देखील जेटली यांचे चांगले संबंध होते.
जेटलींकडून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या - रावसाहेब दानवे
अरुण जेटलींकडून खूप गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत. गेल्या २० वर्षापासून मी त्यांच्यासोबत काम करत होतो. भाजपच्या उभारणीमध्ये त्यांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या जाण्याने पक्षाचे मोठे नुकसान झाल्याचे दानवे म्हणाले.