मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या आरोपांची पोलखोल करण्यासाठी आज भाजपकडून 'आता बघाच तो व्हिडीओ' हा ठेवण्यात आलेला 'शो' फ्लॉप झाला. राज ठाकरे यांनी 'लाव रे तो व्हिडिओ' सांगत जे पुरावे जनतेसमोर मांडले त्याची पोलखोल भाजपला करण्यात अपयश आले. त्यामुळे वांद्रे येथील रंगशारदामध्ये घेण्यात आलेल्या सभेत राज ठाकरे यांचाच अधिक प्रचार भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी दाखवलेल्या व्हिडिओतून झाला असल्याच्या गप्पा उपस्थितांमध्ये रंगल्या होत्या.
शेलार यांनी मोठा गाजावाजा करत रंगशारदामध्ये दोन मोठ्या स्क्रीनवर राज ठाकरे यांची पोलखोल करण्यासाठी लवाजमा केला होता. ठाकरे यांनी मागील २० दिवसांत जे जे दाखवले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप केले ते कोणत्याही पुराव्यानिशी आणि आधार नसलेले होते, असा दावा शेलार यांनी करत ठाकरे यांच्यावर टीका केली. ठाकरे यांनी दाखवलेल्या ३२ प्रकरणात आरटीआयमधून माहिती घेतली नाही, भाजपकडून फुटेज घेतले नाहीत, अर्धवट बातमीवर खोटे सांगण्याचा प्रयत्न केला. त्याला पुरावा दिला नाही. म्हणूनच आम्ही ठाकरे यांच्या असत्य व खोट्या प्रचाराची आम्ही पोलखोल करत आहोत, असे सांगत शेलार यांनी काही व्हिडिओ दाखवून भाजपची बाजू सत्याची असल्याचा दावा केला.
सत्याच्या आधारावर राजकारण करणे आमची संस्कृती तर असत्यावर बोलणे राजची प्रकृती आहे. त्यामुळे राज ठाकरे हे राम गणेश गडकरी यांच्या कवितेतील 'चिंतातुर जंतू' आहेत. त्यांची आम्हाला राजकीय मुक्ती करायची आहे, असा इशारा देत आपली खंत व्यक्त केली आणि मित्रा खरच तू चुकलाच, अशी भावना व्यक्त केली.