महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 26, 2023, 6:41 PM IST

ETV Bharat / state

Jitendra Navalani Case : जितेंद्र नवलानी यांच्या विरोधात अँटी करप्शन ब्युरोचा अहवाल न्यायालयात सादर

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कुलाबा येथील व्यापारी जितेंद्र उर्फ ​​जितू नवलानी यांच्याविरुद्ध लाचखोरीच्या प्रकरणाचा तपास करत असलेल्या एसीबी कोर्टात सी समरी रिपोर्ट दाखल केला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी बिल्डरांकडून खंडणी उकळण्याच्या रॅकेटमधील दलाल असल्याच्या आरोपानंतर नवलानी यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता.

ACB Court
एसीबी कोर्ट

मुंबई : संजय राऊत यांनी जितेंद्र नवलानी यांच्या विरोधात एका पत्रकार परिषदेत आरोप केले होते. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात आली होती चौकशी नंतर नवलानी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. राज्यात महाविकास आघाडीची सरकार गेल्यानंतर शिंदे फडणवीस सरकारने नवलानी यांच्या विरोधात सुरू असलेली चौकशी थांबवली होती. त्यानंतर आता अँटी करप्शन ब्युरो कडून या प्रकरणात सी समरी रिपोर्ट सत्र न्यायालयात दाखल करण्यात आला असल्याने त्यांची या प्रकरणातून सुटका होण्याची शक्यता आहे.

जितेंद्र नवलानी हे ईडीचे अधिकारी म्हणून वावरत असून खंडणी उकळत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. गावदेवी येथील पोलिस निरीक्षक अनुप डांगे यांनी नवलानी यांच्या पबवर कारवाई केल्यामुळे डांगे यांना निलंबित करण्यात आले. पुन्हा सेवेत घेण्यासाठी परमबीर सिंह यांनी पैसे मागितले असा आरोप डांगे यांनी केला होता. याचबरोबर नवलानी यांच्याविरोधात एसीबीकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. या सर्व तक्रारींची एसीबीकडून प्राथमिक चौकशी करण्यात आली. या चौकशीमध्ये नवलानी आणि त्यांच्या इतर साथीदारांनी विविध खासगी कंपन्यांकडून ईडी अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करून सन 2015 ते 2021 या कालावधीत तब्बल 58 कोटी 96 लाख रुपये स्वीकारल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. हे पैसे वेगवेगळ्या नावांनी सुरू करण्यात आलेल्या बनावट कंपन्यांच्या खात्यांवर भरण्यात आले आणि त्यानंतर फी स्वरूपात ते नवलानी यांनी स्वतःच्या मालकीच्या कंपन्यांमध्ये वळविले. प्राथमिक तपासामध्ये हे पैसे गैरमार्गाने स्वीकारल्याचे दिसून येत असल्याने एसीबीने नवलानी यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 कलम 8 व कलम 7 अ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.





संजय राऊत यांनी शिवसेना भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत जितेंद्र नवलानी यांच्या नावाचा उल्लेख केला होता. ईडीकडे येणाऱ्या प्रकरणांतील वसूली एजंट असं राऊतांनी नवलानींचं वर्णन केलं होतं. याआधी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासोबत नवलानी यांचे नाव पहिल्यांदा जोडले गेले होते. परमबीर सिंह यांचे निकटवर्तीय असल्यामुळे याच गुन्ह्यातून नवलानी यांचे नाव हटवण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा आरोप तक्रारदार पोलीस अधिकारी अनूप डांगे यांनी केला होता. परंतु, आपण तसे करण्यास नकार दिला, त्यावेळी आपली बदली करण्यात आली आणि नंतर ही बदली रद्द करण्यासाठी परमबीर सिंह यांच्यावतीने दोन कोटींची लाच मागितल्याचा आरोपही करण्यात आला. तसेच या प्रकरणावरून परमबीर सिंह आणि रेस्टॉरंट बार मालकांचे जवळचे संबंध असल्याचा आरोपही झाला होता.




23 नोव्हेंबर 2019 च्या रात्री जितेंद्र नवलानी यांचा वाढदिवस होता. हा वाढदिवस ते डर्टी बन्स या स्वत:च्या मालकीच्या रेस्टॉरंट अँड बारमध्ये आपल्या मित्रपरिवारासोबत साजरा करत होते. रात्रीचे दोन वाजले तरी हॉटेल सुरूच असल्यामुळे रात्रपाळीवर असलेले अनुप डांगे बार बंद करण्यासाठी पोहोचले. त्यावेळी त्यांची तिथे बातचीत सुरू असताना अचानक तेथील लिफ्टमध्ये काहीजणांत हाणामारी सुरू झाली. या मारामारीमध्ये काही महिलांसह सहा जणांचा समावेश होता. एफआयआरमध्ये नोंदवलेल्या माहितीनुसार रोहन, योहान साची मेकर, इसराम मुन्नार यांच्यात हाणामारी सुरू होती.

भांडने सोडवण्यासाठी अनूप डांगे मध्ये पडले असता त्या महिलेनं डांगे यांना शिविगाळ करत त्यांच्यावर हल्ला चढवला. यामध्ये डांगे यांचा युनिफॉर्म फाटला. तेथेच उपस्थित असलेल्या संतोष जहांगिर याने अचानक मधे घुसत हाणामारीला सुरूवात केली. यावेळी डांगे यांनाही मार लागला. त्यानंतर जितेंद्र नवलानी यांनी मध्ये पडत सर्वांना तेथून बाजूला केले आणि निघून जाण्यास सांगितलं. मात्र डांगे जहांगिर याला पकडण्यासाठी पुढे सरसावले त्यावेळी नवलानी यांनी त्यांना अडवले आणि जहांगिरला तिथून पळून जाण्यास मदत केली, असा पोलिसांचा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने या सर्वांविरोधात गुन्हा दाखल केला.


गुन्हा दाखल झालेल्यांपैकी रोहन आणि योहान यांना त्या रात्रीच पोलिसांनी जागेवर जामीन मंजूर केला. साची मेकर आणि इसराम मुन्नार यांना कोर्टाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. तर फरार संतोष जहांगिर उर्फ सत्याला नंतर अटक करण्यात आली. मात्र त्यालाही कोर्टाने जामीन मंजूर केला होता. 14 डिसेंबर 2021 रोजी मुंबई पोलिसांनी या प्रकरणी पुरवणी आरोपपत्र दाखल केलं आहे. त्यामुळे जितेंद्र नवलानी यांनी गुन्हा रद्द करण्याऐवजी दोषमुक्तीची याचिका दाखल करायला हवी असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील अरूणा पै कामत यांनी उच्च न्यायालयात केला. मात्र एप्रिल 2020 मध्ये पोलीस उपायुक्तांनी दाखल केलेल्या अहवालात या संपूर्ण प्रकरणात जितेंद्र नवलानी यांना क्लीन चीट देण्यात आल्याचा दाखला त्यांच्यातर्फे जेष्ठ वकील आभात पोंडा यांनी उच्च न्यायालयात केला होता.

हेही वाचा : Nawab Maliks : बनावट कागदपत्रे प्रकरण; फराज मलिकांवरील कारवाईवरून न्यायालयाने ओढले ताशेरे

ABOUT THE AUTHOR

...view details