महाराष्ट्र

maharashtra

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची दिवाळी तुरुंगात, 6 नोव्हेंबरपर्यंत 'ईडी' कोठडी

By

Published : Nov 2, 2021, 4:22 PM IST

Updated : Nov 2, 2021, 4:51 PM IST

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना 6 नोव्हेंबरपर्यंत 'ईडी' कोठडी सुनावण्यात आली आहे. शंभर कोटी वसुली प्रकरणी ईडीकडून देशमुख यांना मंगळवारी मध्यरात्री उशीरा अटक करण्यात आली होती. त्यांना आज (दि. 2) सुटीकालीन विशेष न्यायालयात उभे करुन न्यायाधीशांनी 6 नोव्हेंबरपर्यंत त्यांना ईडी कोठडी सुनावली आहे. यामुळे त्यांची यंदाची दिवाळी तुरुंगातच होणार आहे.

माजी गृहमंत्री देशमुख
माजी गृहमंत्री देशमुख

मुंबई -माजी गृहमंत्रीअनिल देशमुख यांना 6 नोव्हेंबरपर्यंत 'ईडी' कोठडी सुनावण्यात आली आहे. शंभर कोटी वसुली प्रकरणी ईडी (सक्तवसुली संचालनालय) कडून देशमुख यांना मंगळवारी मध्यरात्री उशीरा अटक करण्यात आली होती. त्यांना आज (दि. 2) सुटीकालीन विशेष न्यायालयात उभे करुन न्यायाधीशांनी 6 नोव्हेंबरपर्यंत त्यांना ईडी कोठडी सुनावली आहे. यामुळे त्यांची यंदाची दिवाळी तुरुंगातच होणार आहे.

ईडीने 14 दिवसांच्या कोठडीची केली होती मागणी

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक केल्यानंतर वैद्यकीय तपासणी करून सुटीकालीन विशेष न्यायालयात सुनावणीसाठी ईडीने हजर केले होते. यावेळी न्यायाधीश पी. बी. जाधव यांनी दोन्ही पक्षाचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी ईडीकडून अनिल देशमुख यांच्यासाठी 14 दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आली होती. मात्र, न्यायाधिशांनी 6 नोव्हेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे.

तब्बल 14 तासांच्या चौकशीनंतर झाली अटक

सोमवारी (दि. 1 नोव्हेंबर) रोजी सकाळी अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले होते. त्यानंतर त्यांची सुमारे 14 तास ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांना अखेर मंगळवारी (दि. 2 नोव्हेंबर) मध्यरात्री अटक करण्यात आले. दरम्यान, रात्रभर अनिल देशमुख हे ईडी कार्यालयात राहिले. त्यानंतर आज सकाळी त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांनी वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना विशेष न्यायालयात हजर करण्यात आले.

काय आहेत आरोप..?

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या खंडणी वसुलीचा आरोप केल्यावर परमबीर सिंह यांनाही आपले आयुक्तपद सोडावे लागले होते. ईडीने अनिल देशमुख यांना चौकशीसाठी समन्स बजावल्यानंतर महाविकास आघाडीने परमबीर सिंह यांच्याविरोधात कारवाई सुरू केली. परमबीर सिंह यांच्याविरोधात खंडणी वसुलीचे गुन्हे दाखल करण्यात आले. ठाणे पोलिसांनी सिंह यांना चौकशीसाठी बोलावले. पण, त्यांनी काहीच प्रतिसाद न दिल्याने ठाणे पोलिसांनी सिंह यांच्याविरोधआत लुकआऊट नोटीस बजावली होती.

काय आहे प्रकरण..?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गंभीर आरोप केले होते. त्या पत्रानुसार, निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे हे क्राईम इंटेलिजन्सचे यूनिट हेड करत होते. गेल्या काही महिन्यांत गृहमंत्री अनिल देशमुखांनी कित्येक वेळा वाझेंना त्यांच्या 'ज्ञानेश्वर' या निवासस्थानी बोलवले आणि दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करायला सांगितले. देशमुख वाझेंना म्हणाले की, मुंबईत 1 हजार 750 बार आणि रेस्टॉरेंट आहेत आणि त्यातल्या प्रत्येकाकडून 2 ते 3 लाख रुपये कलेक्ट केले तरीसुद्धा महिन्याला 40 ते 50 कोटी रुपये सहज उपलब्ध होतील. राहिलेली इतर रक्कम इतर मार्गांनी जमा करता येईल. देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या निवसस्थानी बोलवायचे. पोलिसांना ते सातत्याने सूचना द्यायचे. मला किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या बंगल्यावर बोलवायचे आणि पैसे गोळा करण्यासाठी टार्गेट द्यायचे. टार्गेटनुसार ते पोलीस अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाजात, तसेच आर्थिक व्यवहारात सल्ला आणि निर्देश द्यायचे. पैसे गोळा करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचा ते उपयोग करायचे. त्यांचे हे भ्रष्ट आचरण अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या नजरेस आले होते, आदी आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुखांवर केले होते. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्रे लिहून हे आरोप केले होते.

ईडीचे पाच वेळा समन्स

या आरोपांप्रकरणी ईडीने देशमुख यांना पाच वेळा समन्स बजावले होते. चौकशीसाठी हजर होण्यासाठी ईडीने देशमुख यांना समन्स बजावले होते. चौकशीसाठी उपस्थित न राहिल्यास त्यांच्यावर 'लूक आऊट' नोटीसदेखील बजावली जाऊ शकते, असेही संकेत ईडीने तेव्हा दिले होते.

सत्र न्यायालयाचे समन्स

अनिल देशमुख ईडीच्या चौकशीला सतत गैरहजर राहत असल्याने 1 ऑक्टोबर रोजी मुंबई सत्र न्यायालयाने देशमुखांना समन्स बजावले होते. 16 नोव्हेंबरपर्यंत आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश कोर्टाने देशमुखांना दिले होते. तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुखांवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांविषयी प्राथमिक चौकशी व आवश्यक असल्यास कायद्यानुसार पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने सीबीआयलाही दिले होते. ईडीने पाचवेळा देशमुख यांना चौकशीचे समन्स बजावले. मात्र, देशमुख गैरहजर राहिले होते. देशमुख यांनी उच्च न्यायालयात या प्रकरणी धाव घेतली होती. मात्र, उच्च न्यायालयानेसुद्धा देशमुखांच्या याचिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले. अद्यापही यावर न्यायालयाने निर्णय दिलेला नाही. मात्र, अनिल देशमुख वारंवार ईडीच्या चौकशीला गैरहजर राहत असल्याने मुंबई सत्र न्यायालयाने देशमुखांना समन्स बजावले. 16 नोव्हेंबरपर्यंत आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले होते. ईडीने देशमुख तपासात सहकार्य करत नसल्यामुळे विशेष न्यायालयात याचिका दाखल केली होती.

देशमुख यांच्या पत्नीलाही समन्स

ईडीने देशमुखांची पत्नी आरती देशमुख यांनाही समन्स बजावले होते. या समन्समध्ये त्यांना चौकशीच्या अनुषंगाने काही कागदपत्रांसोबत मुंबई येथील कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले होते.

हे ही वाचा -नवाब मलिक हे मतिमंद, त्यांची मानसिक स्थिती तपासली पाहिजे - यास्मीन वानखेडे

Last Updated : Nov 2, 2021, 4:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details