मुंबई :मौजे भोसे (जि. सांगली) येथील राष्ट्रीय महामार्गाच्या कामामध्ये येणारा चारशे वर्ष पुरातन असलेला वटवृक्ष वाचविण्याबाबत राज्याचे पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून विनंती केली आहे. त्याचबरोबर आदित्य ठाकरे यांनी सांगली जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून हा वटवृक्ष वाचविण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना दिल्या.
सांगली जिल्ह्यातील ४०० वर्ष जुन्या वटवृक्षाला वाचवा, आदित्य ठाकरेंची गडकरींना पत्राद्वारे विनंती - aditya thackeray news
मौजे भोसे (जि. सांगली) येथील राष्ट्रीय महामार्गाच्या कामामध्ये येणारा चारशे वर्ष पुरातन वटवृक्ष वाचविण्याबाबत राज्याचे पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून विनंती केली आहे.
![सांगली जिल्ह्यातील ४०० वर्ष जुन्या वटवृक्षाला वाचवा, आदित्य ठाकरेंची गडकरींना पत्राद्वारे विनंती सांगली जिल्ह्यातील ४०० वर्ष जुन्या वटवृक्षाला वाचवा](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-02:41:02:1594977062-mh-mum-at-tree-mumbai-7204684-17072020143957-1707f-1594976997-256.jpg)
राज्याच्या पर्यावरण संवर्धनासाठी राज्य शासन व्यापक कार्य करीत आहे. वृक्षसंवर्धनही त्याअनुषंगाने फार महत्वाचे आहे. सांगली जिल्ह्यातील संबंधीत वटवृक्ष पुरातन असून त्याचे जतन होणे गरजेचे आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. आदित्य ठाकरे यांनी याबाबत केंद्रीय मंत्री गडकरी यांना पत्र लिहून विनंती केली आहे. आपल्या विभागामार्फत रत्नागिरी - कोल्हापूर - मिरज - सोलापूर या राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६चे काम सुरू आहे. या नियोजित रस्त्याच्या कामामुळे परिसरातील शेतकरी बांधव आणि नागरिकांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. याबद्दल मंत्री ठाकरे यांनी आभार व्यक्त केले.
मिरज ते पंढरपूर या शहरांच्या दरम्यान हा महामार्ग मोजे भोसे (तालुका मिरज, जि.सांगली) या गावातून देखील जातो. मोजे भोसे गावातील गट क्र. ४३६ येथे यल्लमा देवीचे पुरातन मंदिर असून या मंदिरासमोरच सुमारे ४०० वर्षांपूर्वीचा महाकाय वटवृक्ष आहे. त्याचा विस्तार सुमारे ४०० चौ.मी. इतका व्यापक आहे. हा वटवृक्ष त्या परिसरातील एक ऐतिहासिक ठेवा तर आहेच, त्याचबरोबर ते वटवाघुळ आणि इतर दुर्माळ पक्षी यांच्याकरीता नैसर्गिक निवासस्थान देखील आहे. तथापि, नियोजित राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६च्या कामामुळे या पुरातन वटवृक्षास बाधा पोहोचत असल्याने वटवृक्ष तोडावे लागेल किंवा पर्यायी जागेवरून रस्ता करावा लागेल असे मिरज उपविभागीय अधिकारी यांच्या अहवालात नमूद केलेले आहे. या वटवृक्षाचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेता तसेच परिसरातील पर्यावरणाच्या होणाऱ्या ऱ्हासाचा विचार करता मोजे भोसे येथील संबंधीत जागेवरील महामार्गाचे संरेखन काही प्रमाणात बदलून वटवृक्षाचे जतन होण्याबाबत कार्यवाही करण्याची विनंती मंत्री ठाकरे यांनी केली आहे.