मुंबई:शिंदे गटाचे नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी एका जाहीर कार्यक्रमात मराठा मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही गद्दारी केल्याची कबुली दिली. आदित्य ठाकरे यांना याबाबत विचारले असता, शिंदे गटातील नेत्यांचा खरपूस समाचार घेतला. मी यापूर्वी सांगितले आहे. प्रत्येक सभेत सांगत आलो आहे. हे गद्दार आहेत. राज्यातील जनतेसाठी काय केले हे सांगण्यासारखे काही नाही. त्यामुळे निवडणुका तोंडावर आल्या की, भाजप आणि शिंदे गटाकडून जाती जातीत, धर्माधर्मात वाद निर्माण करायचा प्रयत्न होईल. राज्यातील जनतेने याकडे लक्ष देऊ नये. महाराष्ट्र म्हणून आपण सध्या अंधारात जात आहोत. कृषी केंद्र आणि उद्योग क्षेत्र कोलमडले आहे, असे ठाकरे म्हणाले. तसेच, गुलाबराव पाटील यांच्या पाईपलाईनचे विषय आमच्याकडे आले असेल. त्याविषयी अधिवेशनात मी आवाज उठवणार असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.
आता महाविकास आघाडीच:राज्यातील सत्ता संघर्षाचे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. ४० आमदार अपात्र होतील, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. तसेच लवकरच पोट निवडणूक लागेल किंवा मध्यवर्ती निवडणूक लागतील, असे ठाकरे म्हणाले. आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी सरकार सत्तेत येईल, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका महाविकास आघाडी म्हणूनच लढवणार असल्याचे ठाकरे म्हणाले.
म्हणून गद्दारी केली:एक मराठा चेहरा आमच्या शिवसेनेतून बाहेर जात होता. त्याला मुख्यमंत्री करण्यासाठी मी गद्दारी केली. हो एकनाथ शिंदे यांच्यासाठी मी त्याग केला, अशी कबुली मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. गुलाबराव पाटील आज मुख्यमंत्री यांच्या बाजूला बसतात. तुमच्या मतदारसंघाचा जयजयकार आहे, असे पाटील म्हणाले. तसेच आम्ही मराठा मुख्यमंत्री केला. आम्ही वेडा आहोत का? तुम्ही शरद पवार काय करताय, एकनाथ शिंदे कोण आहेत? एक एक मराठा चेहरा असून त्याला मुख्यमंत्री केला. त्यासाठीच गद्दारी केल्याचे पाटील म्हणाले.