मुंबई: शिवसेनेतील फुटीचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ठ असताना निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्हाबाबत महत्त्वपूर्ण निकाल जाहीर केला. या निर्णया विरोधात निवडणूक आयोग, शिंदे गट भाजपवर सर्व क्षेत्रातून चौफेर टीका होत आहे. शिवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी देखील निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका केली. ईसी सारखी तडजोड केलेली संस्था संपूर्ण लोकशाहीला संपवू पाहत आहे. चोरांच्या टोळीला कायदेशीर ठरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु, चोरी कायदेशीर ठरू शकत नाही. या लोकांकडे लपवण्यासाठी, चोरण्यासाठी आणि इतरांची ओळख वापरण्यासाठी खूप काही आहे. मात्र त्यांना स्वतःच्या चेहरा वापरण्याची लाज वाटते, अशा शब्दात ट्विटरवर तीव्र भावना व्यक्त करत निवडणूक आयोग आणि शिंदे गटाचा खरपूस समाचार घेतला.
उद्धव ठाकरेंनी ललकारले:निवडणूक आयोगाने कपटनितीने आपले चिन्ह गद्दार चोरांना दिले. त्याच कपटनीतीने आपले मशाल हे चिन्ह देखील गोठवले जाऊ शकते. पण तुमच्या जोरावर पुन्हा भगवा फडकवण्याची ताकद माझ्यात आहे. शिवसेनेला संपवता येणार नाही. निवडणूक आयोग आज भाजपचा गुलाम झाला आहे. सरकारी यंत्रणा गुलाम बनली आहे. हे चोर धनुष्यबाण हाताळू शकणार नाहीत. हेच शिवधनुष्य रावणाला सुद्धा मिळाले होते. मात्र, त्याला ते सांभाळता आले नाही. तो पडला होता. हा रावण देखील असाच पडेल, असे सूचक विधान केले. तसेच, शिवसेना चोराला माहीत नाही की, त्यांनी मधमाशांच्या पोळ्यावरती दगड मारला आहे. माशांचा डंका आता दाखवण्याची वेळ आली आहे. निवडणूक आयोगाने गुलामी केली आहे. निवृत्त झाल्यावर कदाचित ते कुठले तरी राज्यपाल होतील. सरकारी यंत्रणा गुलाम बनल्या. पूर्वी मोदींचे मुखवटे घालून आले होते. आता बाळासाहेबांचे मुखवटे घालून महाराष्ट्रात यावे लागत आहे. शिवसेना संपवणे शक्य नाही, असा इशारा ठाकरेंनी दिला आहे.