महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रेल्वे रुळावर कचरा टाकल्यास होणार कारवाई; 650 रहिवाशांना बजावणार नोटीस - Senior Security Commissioner Jitendra Srivastava

लोकल मार्गावरील अस्वच्छता, रुळांवर जमा होणारा कचरा नेहमीच रेल्वेसमोर आव्हान ठरते. त्यामुळे, रेल्वेला मोठ्या समस्यांना समोर जावे लागते. आता रेल्वे मार्गावर कचरा फेकणाऱ्यांविरोधात रेल्वेकडून कारवाई केली जात आहे. तसेच, रेल्वे मार्गालगत राहणाऱ्या रहिवाशांना रेल्वे प्रशासनाकडून नोटीस पाठविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

Railway
रेल्वे

By

Published : Feb 16, 2021, 10:27 PM IST

Updated : Feb 16, 2021, 10:42 PM IST

मुंबई - लोकल मार्गावरील अस्वच्छता, रुळांवर जमा होणारा कचरा नेहमीच रेल्वेसमोर आव्हान ठरते. त्यामुळे, रेल्वेला मोठ्या समस्यांना समोर जावे लागते. आता रेल्वे मार्गावर कचरा फेकणाऱ्यांविरोधात रेल्वेकडून कारवाई केली जात आहे. तसेच, रेल्वे मार्गालगत राहणाऱ्या रहिवाशांना रेल्वे प्रशासनाकडून नोटीस पाठविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. नोटीस पाठवून देखील याचे पालन न केल्यास त्यांच्यावर भारतीय रेल्वे कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे विभागीय वरिष्ठ सुरक्षा आयुक्त जितेंद्र श्रीवास्तव यांनी दिली.

हेही वाचा -महाराष्ट्र कोरोना अपडेट : रुग्ण संख्येत वाढ; मंगळवारी 3663 नवीन रुग्ण, 39 मृत्यू

650 नागरिकांना बजावणार नोटीस

रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे मार्गावरील कचरा आणि नाले साफ करण्यात येते. या सफाईसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च रेल्वे प्रशासनाकडून केला जातो. मात्र, सफाई झाल्यास काही महिन्यांमध्ये परिस्थिती 'जैसे थे' होते. त्यामुळे, रेल्वे मार्गालगत राहणाऱ्या नागरिकांना अनेकदा रेल्वे रुळावर किंवा नाल्यात कचरा न टाकण्याचे आवाहन केले होते. तसेच, रेल्वेकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली होती. त्याचा फायदा अनेक ठिकाणी दिसून आलेला आहे. तर, काही रेल्वे स्थानकांवर याचा परिणाम झालेला नसून आतासुद्धा घरातील कचरा, घाण रेल्वे मार्गावर टाकल्याचे आढळते. तसेच, सांडपाण्याची वाहिनी रेल्वेच्या गटारात सोडली जाते. परिणामी, रेल्वे परिसर भकास आणि अस्वच्छ दिसून येतो. त्यामुळे, तब्बल 650 नोटीस पाठविण्याची योजना मध्य रेल्वे प्रशासनाने केली आहे.

पावसाळ्यात रेल्वेच्या नाल्या तुंबतात

मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर गोळा करण्यात येणाऱ्या कचऱ्यात पाण्याच्या प्लास्टिक बाटल्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. मुंबई सेंट्रल, माटुंगा, वांद्रे, माहिम, कांदिवली, मालाड, बांद्रा, अंधेरी, विरार या पश्चिम रेल्वे स्थानकादरम्यान काचऱ्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. तर, मध्य रेल्वे मार्गावरील मशीद बंदर, भायखळा, विक्रोळी, कांजूरमार्ग सारख्या रेल्वे रुळालगतच्या वस्तीतून रेल्वे रुळावर मोठ्या प्रमाणात कचरा फेकला जातो. त्यामुळे, रेल्वे परिसर अस्वच्छ दिसून येतो. परिणामी, हा कचरा रेल्वे रुळालगत असलेल्या नाल्यात जाते. त्यामुळे, पावसाळ्यात रेल्वेच्या नाल्या तुंबतात. परिणामी, रेल्वे रुळावर पाणी साचते. याचा मोठ्या प्रमाणात रेल्वे सेवांवर परिणाम पडतो.

आतापर्यंत 15 नोटीस पाठवल्या

मध्य रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे परिसरात, रेल्वे हद्दीत कचरा करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. मध्य रेल्वेच्या अभियंता विभागामार्फत नोटीस पाठविल्या जात आहेत. आतापर्यंत मध्य रेल्वे प्रशासनाकडून 15 नोटीस रेल्वे मार्गालगत राहणाऱ्या रहिवाशांना दिल्या आहेत. नोटीस पाठवून देखील याचे पालन न केल्यास कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे विभागीय वरिष्ठ सुरक्षा आयुक्त जितेंद्र श्रीवास्तव यांनी ईटीव्ही भारतला दिली.

हेही वाचा- संजय राठोड प्रमुख मंत्री असल्याने हा विषय सरकारचा- संजय राऊत

Last Updated : Feb 16, 2021, 10:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details