महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 1, 2021, 5:27 PM IST

ETV Bharat / state

म्यूकरमायकोसिसमुळे मुंबईत 'अब तक ५६' रुग्णांचा मृत्यू

नव्याने आलेल्या म्यूकरमायकोसिस या आजाराने मुंबईत ५६ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

म्यूकरमायकोसीस न्यूज
म्यूकरमायकोसीसमुळे मुंबईत 'अब तक ५६' रुग्णांचा मृत्यू 

मुंबई - मुंबईमध्ये गेले वर्षभर कोरोनाचा प्रसार आहे. कोरोनामुळे मुंबईत रोज ४० ते ५० रुग्णांचा मृत्यू होत आहे. त्यातच आता नव्याने आलेल्या म्यूकरमायकोसिस या आजाराने मुंबईत ५६ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. यामुळे मुंबईकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र यापैकी बहुतेक मृत्यू हे मुंबईबाहेरील रुग्णांचे असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

५६ रुग्णांचा मृत्यू -
म्यूकरमायकोसिस म्हणजेच बुरशी या आजाराचे रुग्ण तुरळक प्रमाणात आढळून येत होते. मुंबईमधील रुग्णालयात वर्षाला चार ते पाच रुग्ण आढळून येत होते. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून म्यूकरमायकोसिसच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात ३१ मे पर्यंत तब्बल ४४९ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ५६ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

मुंबईतील १४ जणांचा मृत्यू -
एका आठवड्यापूर्वी मुंबईमधील रुग्णालयात म्यूकरमायकोसीसच्या २२५ रुग्णांवर उपचार सुरु होते. त्यापैकी ५ टक्के रुग्ण मुंबईमधील रुग्ण होते. एका आठवड्यात रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. एकाच आठवड्यात रुग्णांचे प्रमाण ३० टक्क्यांवर गेले आहे. त्यामुळे पालिका रुग्णालयातील म्यूकरमायकोसिसच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. मुंबईमध्ये ३१ मे पर्यंत म्यूकरमायकोसिसमुळे ५६ रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यापैकी १४ मृत्यू हे मुंबईमधील आहेत.

मुंबई बाहेरील ७० टक्के रुग्ण -
मुंबईत उपचार घेत असललेल्या म्यूकरमायकोसिसच्या एकूण रुग्णांपैकी ७० टक्के रुग्ण इतर जिल्ह्यातील व परराज्यातील आहेत. गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, काश्मीर या राज्यासह नाशिक, धुळे, जळगाव, औरंगाबाद या जिल्ह्यातील रुग्ण मुंबईमध्ये उपचार घेत आहेत. मुंबईमध्ये म्यूकरमायकोसिस आजाराने ५६ मृत्यू झाले असले तरी मुंबईमधील १४ रुग्णांचा मृत्यू या आजारामुळे झाला आहे, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

म्यूकरमायकोसिस -
कोविडवर मात केलेल्या सरासरी १० टक्के रुग्णांमध्ये म्यूकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराची गंभीर लक्षणं दिसत असल्याचे निदर्शनास आले आहे. केंद्र सरकारने दिलेल्या आदेशाप्रमाणे महाराष्ट्र तसेच ओडिशा, गुजरात, राजस्थान, पंजाब, तेलंगाना, तामिळनाडू या राज्यात म्यूकरमायकोसिस ही महामारी घोषित करण्यात आली आहे. नवे येणारे रुग्ण व मृत्यूंची संख्या बघता वेळीच निदान व औषधोपचारावर भर देण्याची नितांत गरज आहे. म्यूकरमायकोसिसचे रुग्ण सातत्याने मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे साहजिकच या बुरशीजन्य आजाराची दाहकता कमी करण्यासाठी अॅम्फोटेरिसीन बी, फोटॉन, लिपो सोमॉल यांसारख्या अँटिफंगस औषधांची मागणी पूर्वीच्या तुलनेत ४०० पटींनी वाढली आहे. या आजारावरील औषधांचाही अचानक मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details