महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 27, 2020, 10:08 PM IST

ETV Bharat / state

‘कोरोना’चा चौथा रुग्ण मुंबईत आढळला; पालिकेच्या रुग्णालयात होणार विशेष व्यव्स्था

कोरोना व्हायरसमुळे आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास पालिकेच्या मोठ्या रुग्णालयात विशेष व्यवस्था केली जाणार आहे. तसा आराखडा तयार करण्यात आला आहे. दरम्यान, यापुढे कोरोना व्हायरसबाबत अधिकृत माहिती राज्य सरकारच्या आयडीपीएस विभागाकडूनच दिली जाईल, असे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.

mumbai
रुग्णालय

मुंबई- चीनमध्ये ८० हून अधिक जणांचा बळी घेणार्‍या जिवघेण्या ‘कोरोना’ व्हायरसचा चौथा संशयित रुग्ण मुंबईत आढळला आहे. कोरोनाचे रुग्ण मुंबईत आढळल्याचा धसका आता पालिकेने घेतला असून खबरदारीचा उपाय म्हणून कस्तुरबा रुग्णालयात दहा बेड आणि तैनात डॉक्टर-कर्मचार्‍यांची संख्याही वाढवण्यात आली आहे.

कोरोना व्हायरसबाबत माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

कोरोना व्हायरसमुळे आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास पालिकेच्या मोठ्या रुग्णालयात विशेष व्यवस्था केली जाणार आहे. तसा आराखडा तयार करण्यात आला आहे. दरम्यान, यापुढे कोरोना व्हायरसबाबत अधिकृत माहिती राज्य सरकारच्या आयडीपीएस विभागाकडूनच दिली जाईल, असे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. चीन-हाँगकाँगसह काही देशात कोरोना व्हायरसने हाहाकार उडवला आहे. या व्हायरसच्या तीन संशयित रुग्णांना पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या रक्ताचे नमुने पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीमध्ये पाठवण्यात आले होते. या तीनही रुग्णांना कोरोना व्हायरसची लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

त्यानंतर आज पुन्हा ताडदेव येथील एका रुग्णाला कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या रुग्णाने नुकताच चीन आणि हाँगकाँग येथे प्रवास केला होता. मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल केलेले पहिले तीन रुग्ण वसई, नालासोपारा या विभागातील होते. आता चौथा रुग्ण मुंबईमधील ताडदेवमध्ये आढळला आहे. संबंधित रुग्णांची प्रकृती सुधारली असली तरी राज्य सरकारच्या आदेशानंतरच त्यांना सुट्टी देण्यात येणार आहे.

कस्तुरबात दहा खाटा वाढवल्या

कोरोना व्हायरसचे मुंबईत तीन रुग्ण आढळल्याने पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात ४ वॉर्ड आणि १६ खाटा राखीव ठेवण्यात आल्या होत्या. आता चौथा रुग्ण आढळल्यावर पालिकेने खबरदारी म्हणून कस्तुरबा रुग्णालयात आणखी १० खाटा वाढवल्या आहेत. पालिकेच्या केईएम, शीव, नायर आणि ‘कूपर’ सह उपनगरातील ५ स्पेशालिटी रुग्णालयांमध्ये विशेष व्यवस्था करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. आवश्यकता भासल्यास मोठ्या खासगी रुग्णालयांचीही मदत घेण्यात येणार आहे.

विमानतळावर तपासणी

चीनमधून भारतात परतलेल्या १५५ फ्लाईटमधील ३३ हजार ५५२ प्रवाशांची तपासणी विमानतळावर करण्यात आली आहे. केरळमध्ये ७, मुंबईत ४ आणि बेंगळुरू आणि हैदराबाद येथे प्रत्येकी १ ‘कोरोना’ संशयित रुग्ण आढळले असून विविध रुग्णालयात ते देखरेखीखाली असल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाने कळविले आहे. आजच्या दिवसात १८ फ्लाईटमधील ४३५९ प्रवाशांची स्क्रिनींग करण्यात आली आहे. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे.

‘कोरोनो’ च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह नवी दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद आणि कोची येथे केंद्रीय विशेष दक्षता पथक दाखल होत असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी दिली आहे. विमानतळावर चीनमधून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्यासाठी पालिका आणि विमानतळ प्रशासनाच्या डॉक्टरांचे पथक तैनात असल्याचेही ते म्हणाले. महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील कस्तुरबा रुग्णालयासह पालिकेच्या आरोग्य सुविधेचा आढावा घेऊन आवश्यक सतर्कता बाळगण्याचे निर्देश दिले आहेत.

काय आहे कोरोना व्हायरस

कोरोना व्हायरस हा विषाणू प्रजातीतील असून उंट, मांजर यासारख्या प्राण्यांच्या माध्यमातून त्याचा प्रसार होतो. ज्या मनुष्याच्या शरीरात हा विषाणू शिरकाव करतो त्याला सर्दी, ताप, खोकल्याची लागण होऊन श्वसनाला त्रास होतो. हा आजार न्यूमोनियासारखा असल्याने यामुळे रुग्णाचे मुत्रपिंड (किडनी) निकामी होण्याची शक्यता असते. खोकला, अंगदुखी, ताप अशी लक्षणे असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा किंवा कस्तुरबा रुग्णालयात उपचार घ्यावेत. रोगप्रतिकार शक्ती वाढल्यावर हा आजार बरा होतो. त्यामुळे घाबरून जाऊ नये, असे आवाहन पालिकेने केले आहे.

कॉल सेंटर

कोरोना व्हायरसबाबत केंद्रीय आरोग्य विभागाने कॉल सेंटर सुरू केले आहे. नागरिकांनी +९१-११-२३९७८०४६ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन केंद्रीय आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

फक्त राज्य सरकारच बोलणार

मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात कोरोना व्हायरसचे ३ रुग्ण दाखल होते. मात्र, राज्य सरकार २ रुग्ण असल्याचे सांगत होते. यामुळे पालिका आणि राज्य सरकारमध्ये समन्वय नसल्याचे समोर आले आहे. यापुढे असे प्रकार होऊ नये म्हणून कोरोना व्हायरसबाबत अधिकृत माहिती आयडीपीएस विभागाकडून दिली जाणार आहे. याबाबात रोज सायंकाळी ५ वाजता एक पत्रक आयडीपीएस विभागाकडून काढले जाणार आहे.

हेही वाचा-मनसेच्या बैठकीत 9 फेब्रुवारीच्या मोर्चाची चर्चा.. शॅडो कॅबिनेटची घोषणाही लवकरच

ABOUT THE AUTHOR

...view details