महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 19, 2020, 6:36 AM IST

ETV Bharat / state

मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर धरण 'ओव्हरफ्लो'; सातपैकी तीन धरणे भरली

सात धरणांपैकी २७ जुलैला तुळशी तर ५ ऑगस्टला विहार तलाव ओव्हर फ्लो झाला आहे. सध्या मुंबईत २० टक्के पाणी कपात केली असली तरी धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरुच आहे. त्यामुळे मुंबईकरांची वर्षभराची तहान भागेल इतका पाणीसाठा ऑगस्ट अखेरपर्यंत जमा होईल, असा विश्वास पालिकेच्या जल विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

file pic
मोडकसागर धरण संग्रहित छायाचित्र

मुंबई - मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणक्षेत्रात चांगला पाऊस पडत आहे. चांगल्या पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत असल्याने आज (मंगळवारी) रात्री ९.२४ वाजता मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातपैकी तिसरे धरण भरून ओसंडून वाहू लागले आहे. या आधी तुळशी आणि विहार धरण भरून ओसंडून वाहू लागले आहेत. यामुळे आता लवकरच मुंबईकरांसाठी लागू असलेली २० टक्के पाणीकपात मागे घेतली जाऊ शकते, असे पालिकेच्या जल विभागाने म्हटले आहे.

मोडकसागर धरण 'ओव्हरफ्लो

मुंबईला मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तुळशी व विहार या सात धरणांतून पाणीपुरवठा केला जातो. या धारणक्षेत्रात गेले काही दिवस चांगला पाऊस पडत आहे. यामुळे मोडकसागर तलाव आज १८ ऑगस्ट रोजी रात्री ९.२४ वाजता ओसंडून वाहू लागला आहे. मागील वर्षी हा तलाव २६ जुलै २०१९ रोजी भरुन वाहू लागला होता. तर त्या आधीच्या वर्षी दिनांक १५ जुलै २०१८ रोजी ओसंडून वाहू लागला होता.

मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणात १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधून दरदिवशी ३,८५० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. तलावातील पाण्याच्या पातळीत घट होत असल्याने ५ ऑगस्टपासून २० टक्के पाणी कपात करण्यात आली आहे. परंतु, सध्या धरण क्षेत्रात सतत पडणाऱ्या पावसामुळे धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे.

४ ऑगस्ट रोजी सातही धरणातील पाणीसाठा ५ लाख ५ हजार ८९६ इतका होता. परंतु, तलावांत पावसाची संततधार सुरुच असून सध्या म्हणजेच १८ ऑगस्ट सकाळी ६ वाजेपर्यंत सातही धरणांत ८२.९५ टक्के पाणी साठा जमा झाला आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणारी सर्व धरणे काठोकाठ भरायला सुमारे अडीच लाख दशलक्ष लिटर पाणी साठ्यात वाढ होण्याची गरज आहे.

सात धरणांपैकी २७ जुलैला तुळशी तर ५ ऑगस्टला विहार तलाव ओव्हर फ्लो झाला आहे. सध्या मुंबईत २० टक्के पाणी कपात केली असली तरी धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरुच आहे. त्यामुळे मुंबईकरांची वर्षभराची तहान भागेल इतका पाणीसाठा ऑगस्ट अखेरपर्यंत जमा होईल, असा विश्वास पालिकेच्या जल विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

मागील दोन वर्षांपेक्षा पाणीसाठा कमीच -

१८ ऑगस्ट सकाळी ६ वाजेपर्यंत सातही धरणांत ८२.९५ टक्के पाणी जमा झाले आहे. मागील वर्षी म्हणजेच २०१९ मध्ये आजच्याच दिवशी ९४.२० टक्के म्हणजेच १३ लाख ६३ हजार ४०३ दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा होता. आजच्याच दिवशी २०१८ मध्ये १२ लाख १८ हजार २२२ इतका म्हणजेच ९१.०८ टक्के पाणीसाठा जमा होता. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यावर्षी धरणात पाणी साठा कमी आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details