मुंबई :राज्यातील दहीहंडी या पारंपरिक उत्सवाला साहसी खेळाचा दर्जा राज्य सरकारने दिला आहे. त्या पाठोपाठ आता गोविंदांना प्रोत्साहन देण्यासाठी यावर्षी पासून प्रो गोविंदा दहीहंडी स्पर्धा सुरू करण्यात आली आहे. यासाठी राज्यभरातील गोविंदा पथकांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात आले होते. 197 गोविंदांनी या गोविंदा स्पर्धेसाठी सहभाग नोंदवला आहे. प्राथमिक फेरीनंतर अंतिम फेरीत केवळ 16 गोविंदा पथकांना स्थान दिले जाणार आहे. वरळी येथील एनएससीच्या डोममध्ये 31 ऑगस्टला ही स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेचा थरार सर्व मुंबईकरांना अनुभवता येणार आहे.
26 लाख रुपयांची बक्षिसे :या प्रो गोविंदा दहीहंडी स्पर्धेसाठी राज्यभरातून आलेल्या गोविंदा पथकांना मोठ्या रकमेची बक्षीस देण्यात येणार आहेत. गोविंदा दहीहंडी स्पर्धेच्या विजेत्या पथकाला अकरा लाख रुपयांचे पहिले बक्षीस देण्यात येणार आहे. दुसऱ्या विजेत्याला सात लाख रुपयांचे बक्षीस तिसऱ्या विजेत्या दहीहंडी पथकाला पाच लाख रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. चौथे उत्तेजनार्थ बक्षीस तीन लाख रुपयांचे असणार आहे. या प्रो गोविंदा दहीहंडी स्पर्धेच्या आयोजनासाठी आणि बक्षीसासाठी राज्याच्या उद्योग विभागाने मदत केली आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याची माहिती मंत्री बनसोडे यांनी दिली आहे.