मुंबई -मुंबईकरांची पाण्याची तहान भागवण्यासाठी महानगरपालिकेकडून पिंजाळ आणि गारगाई ही दोन धरणे बांधली जाणार आहेत. त्यापैकी गारगाई धरणासाठी जमीन भूसंपादन करण्यासाठी 148 कोटी रुपये खर्च करण्याला सुधार समितीने शनिवारी मंजुरी दिली आहे.
या निर्णयामुळे प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन लवकर होण्यास मदत होणार आहे. गारगाई प्रकल्पामुळे मुंबईकरांना 440 दशलक्ष लिटर जास्त पाणी मिळणार आहे. या प्रकल्पाखाली 220 हेक्टर वनजमीन जाणार आहे. मुंबई महानगरपालिका 220 हेक्टर जमीन नागपूर येथे खरेदी करून तेथे वनीकरण करणार आहे, अशी माहिती सुधार समितीचे अध्यक्ष सदानंद परब यांनी दिली.
हेही वाचा - अवकाळी पावसासाठी आढावा बैठक; मात्र, शिवसेनेच्या 'या' मंत्र्यांची दांडी
मुंबईकरांना मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार व भातसा अशा सात धरणांमधून दररोज 3 हजार 958 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र, मुंबईचा झपाट्याने होणारा औद्योगिक विकास आणि वाढणारी लोकसंख्या यामुळे पाण्याची मागणीही वाढत आहे. महाराष्ट्र शासनाने डॉ. एम. ए. चितळे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या तज्ज्ञ समितीच्या शिफारशींनुसार, मुंबई महानगरपालिकेने मध्य वैतरणा प्रकल्पाच्या पूर्ततेनंतर गारगाई प्रकल्प विकसित करण्याचे काम हाती घेतले आहे. गारगाई प्रकल्पाच्या कामासाठी पालिकेला महाराष्ट्र शासनाच्या 12 नोव्हेंबर 2013 च्या निर्णयानुसार परवानगीही मिळाली आहे.