मुंबई - रविवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका मध्य आणि हार्बर रेल्वेसेवेला बसला आहे. त्यामुळे या दोन्ही मार्गावरील लोकलच्या १२० फेऱ्या रद्द करण्यात आल्या, तर १५० पेक्षा अधिक लोकल गाड्यांना विलंब झाला. तसेच दोन्ही मार्गावरील लोकल ३० ते ३५ मिनिटे उशिराने धावत होत्या. त्यामुळे कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागला.
पावसाचा मध्य, हार्बर रेल्वेसेवेला फटका; १२० लोकल रद्द - मुंबई
गेल्या ३ दिवसांपासून सतत रेकॉर्ड ब्रेक पाऊस सुरू आहे. त्याचा परिणाम मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल गाड्यांवर झालेला आहे.

लोकल
रेल्वेसेवेबद्दल माहिती देताना मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी
गेल्या ३ दिवसांपासून सतत रेकॉर्ड ब्रेक पाऊस सुरू आहे. त्यात आज सकाळी पावसाचा जोर वाढला होता. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने काही वेळ गाड्या धीम्या गतीने सोडण्यात आल्या. यामुळे एकामागोमाग गाड्यांच्या रांगा लागल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी सांगितले. तसेच आज दुपारच्या सुमारास पावसाचा जोर कमी झाला होता. तेव्हापासून डाउन मार्गावरील गाड्या नियोजित वेळेत सुरू असल्याचेही ते म्हणाले.
रेल्वेने केलेल्या उपाययोजना -
- सायन, कुर्ला, मानखुर्द या स्थानकातील सखल भागात पाण्याचा निचरा होण्यासाठी पंप लावण्यात आले.
- पाणी साचणाऱ्या ठिकाणी रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले.
- गर्दी नियोजनासाठी आरपीएफचे ४०० कर्मचारी प्रत्येक स्थानकात तैनात करण्यात आल्याचे उदासी यांनी सांगितले.