मुंबई- राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीचा निकाल येत्या दोन दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्य शिक्षण मंडळाकडून निकालाची तयारी पूर्ण करण्यात आली असून, यासंदर्भात आज आढावा बैठक झाल्यानंतर निकालाच्या तारखेची घोषणा उद्यापर्यंत होण्याची शक्यता आहे.
कोरोना आणि त्याचा वाढता प्रादुर्भाव बघता मागील दीड महिन्यापासून दहावीच्या परीक्षेचा निकाल रखडला होता. मागील काही दिवसापासून मुंबई आणि परिसरात पोस्ट कार्यालय आणि शाळांमध्ये दहावीच्या उत्तरपत्रिका मोठ्या प्रमाणात तपासाविना पडून होत्या. त्या तपासण्याचे काम नुकतेच पूर्ण झाले असून त्यासंर्दभातील संपुर्ण डेटा राज्य शिक्षण मंडळाकडे सोपविण्यात आला आहे. तर पुणे विभागातही अशाच प्रकारे उत्तरपत्रिका तपासण्याचे काम रखडले होते, त्याचेही काम रविवारी पूर्ण झाले असून त्याचाही डेटा मंडळाकडे उपलब्ध झाला आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होण्याची शक्यता मंडळातील वरिष्ठ अधिकारी सूत्रांकडून वर्तविण्यात आली आहे.