महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 30, 2023, 10:50 AM IST

ETV Bharat / state

Girl Missing Complaint : धक्कादायक! 2022 मध्ये तब्बल 1164 मुली बेपत्ता, काही प्रकरणांमध्ये आढळले राजस्थान कनेक्शन

अलीकडेच पार्कसाईट पोलिसांनी भांडुपच्या राहणाऱ्या सतरा वर्षीय मुलीच्या अपहरणाचा डाव उधळला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी महिलेचेदेखील राजस्थानात अडीच ते तीन लाखात लग्न लावून दिल्याची माहिती समोर आली आहे. 2020 ते 2022 दरम्यान मुंबईत महिलांच्या अपहरणाचा आलेख वाढता असल्याचे चित्र आहे.

Kidnapping girl sell
मुलीचे अपहरण करून लाखोंमध्ये सौदा

राजेश गांगर, वुई द पीपल, सामाजिक संस्थेचे सहसंस्थापक

मुंबई : राज्यात सध्या अपहरणांच्या तक्रारींमध्ये वाढ होत आहे. पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या काही प्रकरणांमध्ये राजस्थान कनेक्शन आढळले आहे. एनसीआरबीच्या अहवालानुसार 2021 मध्ये 363 अल्पवयीन मुलींचे आणि एकूण 418 जणींचे लग्नासाठी अपहरण करण्यात आले होते. यात मुंबईच्या दोन तरुणींचा समावेश होता. राजस्थान, गुजरात आणि हरियाणा या राज्यात मुलींचा जन्मदर कमी असल्याने महाराष्ट्रातील मुलींचे अपहरण केले जात असल्याचे चित्र आहे.



गेल्या वर्षभरातील अपहरणाची प्रकरणे :मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षभरात म्हणजेच 2022 मध्ये बेपत्ता मुली प्रकरणी 1 हजार 164 गुन्हे नोंद आहेत. यापैकी 1 हजार 47 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2020 मध्ये अपहरणाचे एकूण सातशे 79 गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी सहाशे 78 गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. तर 2021 मध्ये हा स्तर वाढला असून अपहरणाचे एकूण 1 हजार 103 गुन्हे दाखल असून 949 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.



आधार कार्डच्या मदतीने माहिती मिळवावी :वुई द पीपल या सामाजिक संस्थेचे सहसंस्थापक राजेश गांगर यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले की, अपहरणाचे गुन्हे आणि खास करून मुलींचे होणारे अपहरण पोलिसांनी आधार कार्डनुसार रेड लाईट भागामध्ये शोधावे. दर दोन-तीन महिन्यांनी व्यक्तींचा डेटा तपासून पाहिला तर मानवी तस्करीचा ट्रॅक ठेवण्यास मुंबई पोलिसांना मदत होईल.

17 वर्षीय मुलीचे अपहरण : गरिबीचा फायदा उचलून, पैशांचे आमीष दाखवून किंवा अपहरण करून एक ते दोन लाखांत मुलींचा सौदा केला जातो. अलीकडेच भांडुपची 17 वर्षीय मुलगी अचानक बेपत्ता झाली होती. पार्कसाईट पोलिसांनी तिची औरंगाबादमधून सुटका केली. ती सुखरूप असून तिचा राजस्थानच्या जालोर येथील पन्नास वर्षीय भावाराम मालीसोबत विवाह जुळवण्यात आला होता. भांडुपला राहणारी सतरा वर्षीय मुलीची फेसबुकवरून एका तरुणासोबत ओळख झाली. त्याला भेटण्यासाठी मिरजला जाण्याच्या उद्देशाने दादर रेल्वे स्टेशनला आली.

राजस्थानी व्यक्तीसोबत लग्न लावून देण्याचा डावतिथे तिकीट रांगेत असलेल्या सुनीता जोशी या 24 वर्षीय महिला आणि लडप्पा गोवी 34 वर्षीय यांनी मिरज तिकिटाची मागणी केली. मुलीचे लक्ष जाताच तिने त्यांच्याशी संवाद साधून तीही मिरजला निघाल्याचे सांगितले. मिरजला उतरल्यानंतर मुलीने महिलेच्या क्रमांकावरून फेसबुकवर ओळख झालेल्या मुलाशी संपर्क साधला. मात्र, त्याने भेटण्यास नकार दिल्याने मुलीने रडण्यास सुरुवात केली. सुनीताने चौकशी करता मुलीने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर सुनीताच्या तावडीत सापडलेल्या मुलीचे तिने राजस्थानी व्यक्तीसोबत लग्न लावून देण्याचा डाव आखला. अटक करण्यात आलेल्या सुनीता जोशी हिचे देखील अडीच ते तीन लाखात लग्न लावून दिल्याची माहिती समोर आली आहे.



राजस्थानात मुलींचा जन्मदर कमी : राजस्थानात काही गावात शेती नाही. त्यामुळे गरीबी आहे. मुलींचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे पुरुष वेगवेगळ्या राज्यात नोकरीसाठी जातात आणि तिथेच स्वतःचा व्यवसाय सुरू करत कुठल्यातरी राज्यातील मुलीशी पैसे देऊन लग्न करण्यास प्राधान्य देतात. सुटका केलेल्या भांडुपच्या मुलीसाठी ही एक लाख वीस हजार विक्रीसाठी देण्यात आले होते. अटक आरोपीचा अधिक तपास सुरू आहे.

हेही वाचा :Teacher Money Stolen : एटीएम कार्ड ऍक्टिव्ह करण्याच्या नावाखाली वृद्ध शिक्षिकेला घातला गंडा; दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

ABOUT THE AUTHOR

...view details