लातूर- जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली असून उदगीर शहरात कर्नाटकातील नागरिकांची वर्दळ असते. यावर अंकुश घालण्यासाठी शहरातील चौकाचौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी निर्जंतुककिकरण करण्यासाठी फवारणी केली जात आहे.
लातूर : उदगीरमध्ये कुठे फावरणी तर कुठे पोलीस बंदोबस्त
लातूर जिल्ह्याला कर्नाटकची सीमा लागून आहे. त्यामुळे कर्नाटकातील काही लोक संचारबंदी असतानाही उदगीरमधून महाराष्ट्रात प्रवेश करत आहेत. त्यांना पोलिसांकडून काठीने प्रसाद दिला जात असून काहींना उठाबशाही काढायला लावत आहे. त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी निर्जंतुककिकरण करण्यासाठी फवारणी केली जात आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी केवळ पोलीस प्रशासनच नाही नगरपालिकेचे कर्मचारीही रस्त्यावर उतरले आहेत. शहरातील भाजीमंडई, दवाखाने तसेच किराणा दुकान या ठिकाणी अग्निशमन दलाच्या गाडीने फवारणी केली जात आहे. तर शहरात प्रवेश करणाऱ्या मार्गावर पोलीस तैनात आहेत. दुचाकी-चारचाकी वाहनधारकांना विचारपूस करूनच शहरात सोडले जात आहे. आवश्यकता नसताना मार्गस्थ होणाऱ्यांना उठाबशा काढून घराकडे जाण्याचा सल्ला दिला आहे. एकंदरीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस प्रशासनासह इतर विभागाचे अधिकारी रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे त्यांच्या आव्हानाला साथ देण्याचे काम नागरिकांनी करणे तेवढेच आवश्यक आहे.
हेही वाचा -गावात येणाऱ्यांचा मुक्काम शेतावरच; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांचा ठराव