लातूर-चाकूर तालुक्यातील नळेगाव लगतच घरणी धरण असतानाही ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. महावितरणाची थकबाकी असल्याने नळेगावसह परिसरातील १२ गावांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला होता. या प्रश्नी बुधवारी लातूर-उदगीर या मार्गावर ग्रामस्थांनी रास्तारोको करताच अवघ्या काही वेळातच हा प्रश्न मार्गी लागला आहे.
लातूर-उदगीर मार्गावर ग्रामस्थांचा रास्तारोको... हेही वाचा-निर्भया प्रकरण : दोषी अक्षय ठाकुरची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली
नळेगाव येथे चाकूर तालुक्यातील मुख्य बाजारपेठ आहे. पाणीपुरवठ्याचे वीजबिल थकीत असल्याने महावीतरने विद्युत पुरवठाच खंडित केला होता. त्यामुळे येथे गेल्या चार महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. घरणी धरणावरुन नळेगावसह परिसरातील १२ गावांनाही याच धरणातून पाणीपुरवठा केला जातो. नळेगाव ग्रामपंचायतीने वीजबिल अदा करुनही महावीतरने विद्युत पुरवठा खंडित केला होता. त्यामुळे बुधवारी लातूर-उदगीर या मार्गावर रास्तारोको करताच जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, तहसीलदार या ठिकाणी हजर झाले होते. प्रश्नी मार्गी लागेपर्यंत रास्तारोको सुरुच राहणार असल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली होती.
त्यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांना बोलावून हा प्रश्न मार्गी लावण्यात आला आहे. त्यामुळे चार महिन्याने का होईना आता नळेगावसह परिसरातील गावांना सुरळीत पाणीपुरवठा होणार आहे. नळेगाव ग्रामपंचायतीने महावितरणचे बिल अदा केले तरी अन्य ग्रामपंचायती वीजबिल अदा करीत नाहीत. परिणामी त्यांच्याबरोबर नळेगावकरांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नळेगाची लोकसंख्या लक्षात घेता स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी सांगितले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य चव्हाण, धामणगावचे सरपंच धनराज पाटील यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती. दरम्यान, पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.