महाराष्ट्र

maharashtra

लातुरात मनसेचा खळखट्याक : नुकसान भरपाईकरता कृषी कार्यालयाची तोडफोड

By

Published : Jul 14, 2020, 8:27 PM IST

बोगस बियाण्यांबाबत कारवाई करण्यासाठी कृषी विभागाची उदासीनता आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी टाळाटाळ होत आहे. यंदा खरीपासाठी पोषक स्थिती असताना केवळ कृषी विभागाने पुरवठा केलेले बियाणे उगवले नाही.

लातुरात मनसेचा खळखट्याक
लातुरात मनसेचा खळखट्याक

लातूर - खरिपातील बोगस बियाणे प्रकरणी मनसे आक्रमक झाली आहे. बोगस बियाण्यांच्या तक्रारी दाखल होऊनही शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळलेली नाही. यामुळे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी विभागीय कृषी सहसंचालकाच्या कार्यालयात राडा केला. कार्यालयाची तोडफोड करून शेतकऱ्यांना त्वरित मदत देण्याची मागणी केली.

बोगस बियाण्यांबाबत कारवाई करण्यासाठी कृषी विभागाची उदासीनता आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी टाळाटाळ होत आहे. यंदा खरीपासाठी पोषक स्थिती असताना केवळ कृषी विभागाने पुरवठा केलेले बियाणे उगवले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. यासंबंधीच्या तब्बल 8 हजार 500 तक्रारी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे केल्या आहेत. गुन्हे दाखल करण्याचा आविर्भाव आणला जात असला तरी यामध्ये तथ्य नसल्याचा मनसेने आरोप केला आहे.

शेतकऱ्यांना नुकसानीच्या बदल्यात बियाणे आणि आर्थिक मदत मिळाल्याचा दावा कृषी विभाग करीत आहे. प्रत्यक्षात अनेक शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित आहेत. त्यामुळे मंगळवारी मनसेचे शेतकरी सेना प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे व पदाधिकारी यांनी थेट कृषी सहसंचालक कार्यालय गाठले. त्यांनी संतापून तोडफोड करण्यास सुरुवात केली.

अनेक वेळा शेतकऱ्यांच्या हिताची मागणी करूनही त्याची पूर्तता होत नसल्याने हा निर्णय घेतला असल्याचे संतोष नागरगोजे यांनी स्पष्ट केले आहे. अवघ्या काही वेळातच जोरदार घोषणाबाजी करीत कृषी सहसंचालकाच्या कक्षाच्या काचा फोडण्यात आल्या. तर घोषणाबाजी करीतच मनसे पदाधिकारी कार्यालयाबाहेर पडले. विशेष म्हणजे हाकेच्या अंतरावर शिवाजी नगर पोलीस ठाणे असतान सरकारी कार्यालयात तोडफोड झाली आहे.

दरम्यान, जिल्ह्यात सोयबीन लागवडीखाली अधिक क्षेत्र आहे. त्यामुळे बोगस बियाण्यांचा शेतकऱ्यांना अधिक फटका बसल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राज्यभरात बोगस बियाण्यांच्या तक्रारी वाढल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details