लातूर-परतीच्या पावसाने केवळ खरीपाचेच नाही तर बागायती क्षेत्रावरील उसाचे नुकसान केले आहे. मांजरा नदीकाठचा परिसर हा ऊस लागवडीचे क्षेत्र म्हणून ओळखला जातो. आता गळीत हंगाम दोन महिन्यावर असतानाच वादळी वारे आणि पावसामुळे हा ऊस आडवा झाला आहे. त्यामुळे कारखान्याने नियमित वेळेच्या अगोदरच कारखाने सुरू केले तर हा ऊस कारखान्यामध्ये नेता येईल. अन्यथा शेतात ऊस असूनही शेतकऱ्यांच्या पदरी काही पडणार नाही, अशी अवस्था झाली आहे.
जिल्ह्यात ऊसाची 60 हजार हेक्टरावर लागवड झाली आहे. पावसाने खरिपातील सोयाबीन, उडीद, मूग याचे प्रचंड असे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील काही ठिकाणी तर पिके वाहून गेली. शिवाय शेत जमीनही वाहून गेल्या आहेत. मांजरा पट्टयात पाऊस अधिक प्रमाणात झाला नसला तरी वादळी वाऱ्याने ऊस भुईसपाट झाला आहे. आडवा झालेल्या ऊसालाच आता कोंब फुटू लागले आहेत. त्यामुळे ऊसाचे मोठे नुकसान होत आहे.
वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने ऊस भुईसपाट - latur farmer news
पावसाने खरिपातील सोयाबीन, उडीद, मूग याचे प्रचंड नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील काही ठिकाणी तर पिके वाहून गेली. शिवाय शेत जमीनही वाहून गेल्या आहेत. मांजरा पट्टयात पाऊस अधिक प्रमाणात झाला नसला तरी वादळी वाऱ्याने ऊस भुईसपाट झाला आहे.
![वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने ऊस भुईसपाट Major damage to sugarcane](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9241626-187-9241626-1603174690087.jpg)
उन्हाळ्यात शेतकऱ्यांनी उसाला टँकरद्वारे पाणी दिले. पावसाळ्यात सर्वकाही सुरळीत होते. पाऊस अधिक प्रमाणात होऊनही शेतकऱ्यांना भीती नव्हती पण दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी-वाऱ्यामुळे ऊस आडवा झाला आहे. खत, बियाणे, ठिबक यासाठी शेतकऱ्यांनी संबंधित कारखान्याकडून हजारोचे कर्ज घेतले आहे. मात्र, वेळेत ऊस नाही गेला तर त्याची परतफेड करायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. त्यामुळे पडलेल्या ऊसाचे अधिक नुकसान होण्यापूर्वी कारखाने सुरू करण्याची अपेक्षा शेतकऱ्यानी व्यक्त केली आहे. तसेच इतर उत्पादकांप्रमाणे ऊस उत्पादकांनाही मदत मिळण्याची अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.