महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 18, 2019, 4:01 PM IST

Updated : Sep 18, 2019, 4:50 PM IST

ETV Bharat / state

लातूर ग्रामीणची उत्सुकता शिगेला; काँग्रेस-भाजपात सरळ लढत

लातूर शहर मतदारसंघाबरोबरच ग्रामीण मतदारसंघावरही देशमुख घराण्याचा प्रभाव राहिला आहे. त्यामुळे हा गड कायम काँग्रेसकडे राहिला असून गेल्या पाच वर्षात ग्रामीणमध्ये भाजपच्या वाढलेल्या प्रभावामुळे निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

लातूर ग्रामीण

लातूर - काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातील तीन गड आजही त्यांच्या ताब्यात आहेत. यामध्ये लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ महत्त्वाचा असून स्थापनेपासून या मतदारसंघावर काँग्रेसचा झेंडा कायम आहे. २ लाख ५ हजार मतदार असलेल्या या मतदारसंघात २०१४ च्या मोदी लाटेत देखील काँग्रेसचे अ‍ॅड. त्र्यंबक भिसे हे १० हजार ५१० मतांनी विजयी झाले होते. लातूर शहर मतदारसंघाबरोबरच या मतदारसंघावरही देशमुख घराण्याचा प्रभाव राहिला आहे. त्यामुळे हा गड कायम काँग्रेसकडे राहिला असून गेल्या पाच वर्षात ग्रामीणमध्ये भाजपच्या वाढलेल्या प्रभावामुळे निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

हेही वाचा -माझा मुख्यमंत्र्यांवर विश्वास, लवकरच भाजपवासी होणार - नारायण राणे

जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघ असून पैकी ३ मतदारसंघ हे भाजपाच्या तर उर्वरीत तीन हे काँग्रेसच्या ताब्यात आहेत. या दोन प्रमुख पक्षाशिवाय इतर कोणत्याही पक्षाला लातूर ग्रामीणच्या जनतेने स्वीकारलेले नाही. लातूर ग्रामीणमध्ये देशमुख कुटुंबाचा मोठा प्रभाव आजही आहे. त्यामुळे आतापर्यंत देशमुख परिवाराने दिलेल्या उमेदवाराला पसंती दिलेली आहे. यंदा तर धीरज देशमुख यांचेच नाव चर्चेत असून त्यांनी मुलाखत देऊन इच्छाही दर्शिवली आहे. विद्यमान आमदार अ‍ॅड. त्र्यंबक भिसे यांनी मात्र 'वेट अ‍ॅण्ड वॉच'ची भूमिका घेतली आहे.

लातूर ग्रामीण

हेही वाचा -तुम्हाला कशी 'झक' मारायचीय ती मारा, शरद पवारांचा तोल सुटला

तर दुसरीकडे भाजपकडून अद्यापही उमदेवार घेषित करण्यात आला नसून महाजनादेश यात्रेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुणालाही ग्रीन सिग्नल दिलेला नाही. मात्र, गतवेळचे भाजपचे उमेदवार रमेश कराड हे गुडघ्याला बाशिंग बांधून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. दिवस उजाडताच मतदारांच्या गाठीभेटी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकांचा त्यांनी धडाका लावला असला तरी उमेदवारीबाबत आपण प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिल्याने संभ्रमता कायम आहे. काँग्रेसकडून जि.प. सदस्य धीरज देशमुख यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. प्रत्यक्ष मतदारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ते मतदाराच्या उंबरट्यापर्यंत पोहचले असून प्रत्यक्ष प्रचाराला त्यांनी सुरुवात केली आहे. ग्रामीण भागातील देशमुखांचे तीन कारखाने, जिल्हा मध्यवर्ती बँक आणि शैक्षणिक संस्था ही जमेची बाजू आहे. शिवाय स्व. विलासराव देशमुख यांना मानणारा गट आजही गावागावात आहे. गत निवडणुकीत मनसेचे संतोष नागरगोजे यांना केवळ २७८५ मते मिळाली होती. शिवाय शिवसेनाही पाच आकडी अंक गाठू शकली नव्हती तर नव्याने दाखल होत असलेल्या वंचितचाही प्रभाव या भागात नगण्य आहे.

हेही वाचा -काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ४० जागाही निवडूण येणार नाहीत - गिरीश महाजन

काँग्रेस-भाजप हे दोनच प्रमुख पक्ष लातूर ग्रामीणमध्ये आहेत. या मतदारसंघात मराठा समाज अधिकच्या संख्येने असून याचा अप्रत्यक्ष फायदा हा काँग्रेसलाच होणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यंदा प्रथमच विधानसभेच्या रिंगणात उतरलेल्या धीरज देशमुख यांना मतदार कौल देणार की, राजयोगाच्या शोधात असलेल्या रमेश कराडांना जनता स्वीकारणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

मतदार संघाच्या अनुशंगाने महत्त्वाच्या बाबी

लातूर ग्रामीण मतदारसंघात देशमुख कुटुंबीयांचे तीन साखर कारखाने आहेत. शिवाय शिक्षण संस्थांच्या माध्यमातून एक जाळे निर्माण झाले आहे. लातूर ग्रामीण मतदारसंघावर स्व.विलासराव देशमुख यांचे विशेष: लक्ष होते. शिवाय या मतदारसंघात माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा शब्दही प्रमाण मानला जातो. तर दुसरीकडे गेल्या पाच वर्षात जिल्ह्यातच भाजपचे वातावरण निर्माण होत आहे. बदलाची ही नांदी या मतदारसंघातही शिरकाव करणार की, काँग्रेसला हा महत्त्वाचा गड कायम ठेवण्यात यश मिळणारे हे निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट होणार आहे.

Last Updated : Sep 18, 2019, 4:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details