महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दुष्काळ दाह.. विक्रीस नेलेल्या जनावरांसाठी चाऱ्यासह पाणीही विकत घेण्याची वेळ

बाजारात ना चाऱ्याची सोय ना पाण्याची. त्यामुळे 100 रुपयाला कडब्याचा पाचूनदा आणि 10 रुपयाला पाण्याची घागर शेतकऱ्यांना घ्यावी लागते. एवढेच नाही तर स्वतःसाठी 5 रुपयाला जारच्या पाण्याची बाटली घेऊन तहान भागवावी लागत आहे. त्यामुळे जनावराच्या वाहतुकीचा, चाऱ्याचा आणि पाण्याचा खर्च पाहता दिवसाकाठी 800 ते 1000 रुपये शेतकऱ्यांना मोजावे लागत आहेत.

By

Published : May 14, 2019, 6:06 PM IST

दुष्काळ दाह.. विक्रीस नेलेल्या जनावरांसाठी चाऱ्यासह पाणीही विकत घेण्याची वेळ

लातूर - दावणीची जनावरे बाजारात विकून दुष्काळातून मुक्ती मिळवण्यासाठी सध्या मुरुडच्या बाजारात जनावरांची गर्दी होत आहे. मात्र, चारा आणि पाणीटंचाई शेतकऱ्यांची पाठ सोडता-सोडत नाही. बाजारात विक्रीसाठी दाखल केलेल्या जनावरासाठी शेतकऱ्याला चारा नाहीतर पाणीही विकत घेण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढवत आहे. दुष्काळामुळे जनावराची विक्री होत नाही. मात्र, तेथेही शेतकऱ्याला जनावरांवर खर्च करावा लागत आहे.

स्पेशल पॅकेज - दुष्काळाची दाहकता पाहा.....


आगामी काळातील खरीप मशागतीची पर्वा न करता चारा आणि पाणीटंचाईतून मुक्ती मिळण्यासाठी शेतकरी जनावरे बाजारात दाखल करत आहे. कवडीमोल दर मिळत असतानाही केवळ जिल्ह्यातूनच नव्हे तर संबंध मराठवाड्यातून जनावरे दाखल होत आहेत. बाजारात ना चाऱ्याची सोय ना पाण्याची. त्यामुळे 100 रुपयाला कडब्याचा पाचूनदा आणि 10 रुपयाला पाण्याची घागर शेतकऱ्यांना घ्यावी लागते. एवढेच नाही तर स्वतःसाठी 5 रुपयाला जारच्या पाण्याची बाटली घेऊन तहान भागवावी लागत आहे. त्यामुळे जनावराच्या वाहतुकीचा, चाऱ्याचा आणि पाण्याचा खर्च पाहता दिवसाकाठी 800 ते 1000 रुपये शेतकऱ्यांना मोजावे लागत आहेत.


त्याकारणाने आठवडी बाजारात घागर घेऊन जाताना महिला आणि जागोजागी जारच्या पाण्याचे स्टॉल पाहावयास मिळत आहेत. चारा आणि पाणीटंचाईची दाहकता दिवसेंदिवस वाढत असताना एक छावणी सुरू करण्याचे सामर्थ्य जिल्हा प्रशासनाने दाखविलेले नाही. यामुळेच ही वेळ येत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, जनारांची विक्री झाली नाही तर खर्च मात्र अटळ आहे. जनावरे शेतातील दावणीला राहिली काय आणि बाजाराच्या दावणीला राहिली काय दोन्ही कडेही शेतकऱ्यांचे हाल होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details