महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 1, 2019, 1:33 PM IST

Updated : Nov 1, 2019, 2:13 PM IST

ETV Bharat / state

व्हिडीओ व्हायरल : बळीराजाच्या 'त्या' आरोळीनं राजकीय पक्षांना पाझर फुटेल का?

राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडात आलेला घास हिरावला आहे. या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्याचे पावसाने केले मोठे नुकसान

लातूर - सध्या राज्यात सत्ता स्थापनेसाठी भाजप-शिवसेनेच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. मात्र, मुख्यमंत्री पदावरून दोन्ही पक्षात तिढा कायम असल्याचे चित्र आहे. अशातच राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडात आलेला घास हिरावला आहे. या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्याचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे.

मुख्यमंत्री तू की, मी म्हणण्यात शेतकरी मेला रं......मुख्यमंत्र्याच्या नादात शेतकरी वाऱ्यावर...अबोबोबोबो.....शेतकऱ्याला कोणी वाली आहे की नाही रं.... सरकार मायबाप कुठे बसलं रे...विमा कंपनी कुठे बसली रे....अबोबोबोबो.....अशा स्वरुपात शेतकऱ्याने आपल्या वेदना व्यक्त केल्या आहेत. पांडुरंग व्यंकटराव वाघमारे असे लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील वंजारवाडा येथील त्या शेतकऱ्याचे नाव आहे.

बळीराजाच्या 'त्या' आरोळीनं राजकीय पक्षांना पाझर फुटेल का?

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पांडूरंग यांच्या सोयाबीनचे पिकाचे संपूर्ण खळे वाहून गेले आहे. त्यांच्या डोळ्यादेखत सारे पिकं वाहून गेले. गेल्या १५ दिवसांपासून जिल्ह्यात परतीचा पाऊस चांगलाच कोपला असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला आहे. राजकीय पक्ष मुख्यमंत्री कोण? यात गुंतले आहेत. प्रशासन गांभीर्याने घेत नाही. विमा कंपन्यांचा थांगपत्ता लागत नाही, अशी परिस्थिती असल्याचे शेतकऱ्याने म्हटले आहे.

या व्हिडीओतील पांडुरंग यांची आर्त आरोळी मनाला सुन्न करणारी ठरली आहे. या व्हिडीओमध्ये अक्षरशः शेतात मळणी यंत्र सुरू असताना अचानकपणे जोराचा पाऊस आला अन् होत्याच नव्हतं झालं. पूर्ण काढलेली रास आणि जमा केलेले सोयाबीन पाण्यामध्ये शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर वाहून गेले. हे शेतकऱ्यालाही सहन झाले नाही. त्याच्या तोंडून आपसूकपणे सरकारला हाक जाईल अशी आरोळी निघाली. ती हाक मोबाईलमध्ये कैद करून एका शेतकऱ्याने सोशल मीडियावर व्हायरल केली आहे. ही हाक ऐकून तरी सत्तेच्या मस्तीत गुंग असणाऱ्या राजकीय पक्षांना पाझर फुटेल का? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे.

परतीच्या पावसाचा राज्यातील शेतकऱ्यांना जोरदार फटका बसला आहे. अशा स्थितीत राजकीय पक्ष मात्र, सत्ता स्थापनेच्या वाटाघाटीत दंग आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडे कोणी पाहायला तयार नसल्याच्या भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.

28 ऑक्टोबरला जळकोट तालुक्यातील वंजारवाडा येथे पांडुरंग हे सोयाबीनची रास करीत होते. पांडुरंग यांनी 4 बॅग सोयाबीन पेरले होते. सुरुवातीपासूनच पावसाची कमतरता असल्याने उत्पादनात घट तर होणारच होती. असे असतानाही मेहनतीने जगवलेले आणि वाढवलेले सोयाबीन काढणीला येताच पांडुरंग यांनी मजुरांना घेऊन सोयाबीनची रास करण्यास सुरुवात केली होती. मात्र, अचानक मुसळधार पावसाने हजेरी लावली आणि काही क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. जोरदार पावसामुळे शेताजवळचा सांडवा भरला आणि मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले. यामध्येच सोयाबीनची रास वाहून गेली. हे सर्व डोळ्यासमोरच झाल्याने पांडुरंग यांनी टाहो फोडला.

Last Updated : Nov 1, 2019, 2:13 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details