लातूर- यावर्षी प्रथमच सर्व काही वेळेत घडत आहे. शेती मशागतीची कामे, मान्सूनपूर्व पाऊस आणि आता पेरणी योग्य पाऊस झाल्याने बळीराजाची खरिपाच्या पेरणीसाठी लगबग सुरू आहे. गतवर्षी उत्पादनात झालेली घट भरुन काढण्यासाठी शेतकरी सज्ज झाला आहे.
लातुरात मान्सूनची दमदार हजेरी... बळीराजाची पेरणीसाठी लगबग - लातूर खरिप पेरणी बातमी
शेती उत्पादनाच्या दृष्टीने खरिप हंगाम लातूरकरांसाठी महत्वाचा मानला जातो. तब्बल 4 लाख हेक्टरवर यंदा पेरणी होणार असून सर्वकाही वेळेत होऊ लागल्याने शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत. सोयाबीन हे खरिपातील महत्वाचे पीक आहे.

शेती उत्पादनाच्या दृष्टीने खरिप हंगाम लातूरकरांसाठी महत्वाचा मानला जातो. तब्बल 4 लाख हेक्टरवर यंदा पेरणी होणार असून सर्वकाही वेळेत होऊ लागल्याने शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत. सोयाबीन हे खरिपातील महत्वाचे पीक आहे. गतवर्षी हेच पीक अंतिम टप्प्यात असताना, अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि होत्याचे नव्हते झाले होते. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळीने हिरावला होता. त्यामुळे यंदा काय होणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष होते. मात्र, गत आठवड्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. त्यानंतर मशागतीची कामे करण्यास शेतकऱ्यांना वेळ मिळाला आहे.
दोन दिवस जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. जमीन आता पेरणीयोग्य झाल्याने पेरणीला सुरुवात झाली आहे. सर्व काही सुरळीत असले तरी शेतकऱ्यांना यंदा घरचे बियाणे वापरण्याशिवाय पर्याय नाही. कृषी विभागाने केलेल्या मागणीपेक्षा निम्म्याच बियाणांचा पुरवठा झाला आहे. शिवाय महाधन हे बियाणे मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. तर दुसरीकडे गतवर्षी पावसामुळे सोयाबीनचे नुकसान झाले होते. त्यामुळे डागाळलेल्या बियाणांचा वापर करणे शक्य नाही. परिणामी बियाणांसाठी अधिकचा पैसा खर्ची करावा लागत आहे. मात्र, दरवर्षी पावसाच्या लहरीपणामुळे खरिपाचे नियोजन विस्कळीत होत असते. यंदा मात्र सुरुवात तर दमदार झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे.