लातूर -दिवाळीच्या 'बोनस' मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांची दिवाळी अधिकच गोड होते. मात्र, याच बोनसची रक्कम काढून देण्यासाठी लाच मागणाऱ्या कृषी सचिवासाठी ही दिवाळी 'कडू' ठरली आहे. दिवाळी निमित्त देण्यात येणाऱ्या बोनसची रक्कम काढून देतो परंतु त्या बदल्यात एकूण रकमेच्या तीन टक्के रक्कमेची मागणी करणाऱ्या कृषी सचिव भगवान मारोती पाटील यांना लाचलूचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले आहे.
हेही वाचा -सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे - सदाभाऊ खोत
उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याच्या नावे ९९ हजार ४७२ रक्कम ही बोनस म्हणून जमा झाली होती. मात्र, ती काढून देण्यासाठी कृषी सचिव भगवान पाटील यांनी त्यांच्याकडे ३० टक्केनुसार ३० हजार रुपयांची मागणी केली होती. यासंदर्भात तक्रारदार यांनी शुक्रवार रोजी लाचलूचपत विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार शुक्रवारी दुपारी ४ च्या सुमारास कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरातच लाचेची रक्कम स्वीकारताना भगवान पाटील यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
पाटील हे मुळचे परभणी येथील असून नोकरीनिमित्त ते उदगीर येथे राहत होते. कारवाईनंतर उदगीर पोलीस ठाण्यात कलम १९८८ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस उपअधिक्षक माणिक बेद्रे हे पुढील तपास करीत आहे. सदर सापळा रचण्यात कल्पना बारवकर, अर्चना पाटील, उपअधिक्षक माणिक बेद्रे, पो.नि. कुमार दराडे यांचा समावेश होता.