लातूर - युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे सध्या जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने राज्यभर दौरा करत आहेत. आज लातूरमधील युवा संवादाच्या कार्यक्रमादरम्यान ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी दुष्काळाच्या दाहकतेचा पाढा त्यांच्यासमोर वाचून दाखवला.
जनआशीर्वाद यात्रा: सरकार बदलले मात्र, शेतकऱ्यांचे प्रश्न कायम; लातूरमधील विद्यार्थ्यांनी मांडले दुष्काळाच्या दाहकतेचा चित्र
मराठवाड्यात युवा संवादाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. आज पहिल्या दिवशी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दयानंद महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
मराठवाड्यात युवा संवादाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. आज पहिल्या दिवशी ठाकरे यांनी दयानंद महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तरुणांच्या समस्येबरोबर जिल्ह्यातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या अडचणी यावेळी विद्यार्थ्यांनी मांडल्या. गेल्या ३ वर्षापासून जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. यंदाही दुष्काळाची परंपरा कायम असून शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. भर पावसाळ्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना लातूरकरांना करावा लागत आहे, अशी माहिती विद्यार्थ्यांनी ठाकरेंना दिली.
राज्य सरकारच्या उपाययोजना स्थानिक पातळीवर राबवल्या जात नसल्याने शेतकरी मदतीपासून वंचित राहत आहे. २०१४ साली सरकार बदलले मात्र, शेतकऱ्यांचे प्रश्न कायम राहून त्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ झाली आहे. सरसकट कर्जमाफीची मागणी असतानाही त्याची अंमलबजावणी होत नसल्याने शेतकऱ्यांचे प्रश्न अद्यापही कायम आहेत. याबाबत केवळ आश्वासन न देता उपाययोजना करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली. तर भाजपच्या मेगाभारती बरोबर नोकर भरतीही लवकर करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी ठाकरे यांच्याकडे केली. यावेळी युवकांनी स्वतःच्या समस्या तर मांडल्याच शिवाय, जिल्ह्यातील दुष्काळाचीही माहिती दिली. त्यामुळे युवा संवाद हा दुष्काळी स्थितीभोवती फिरल्याचे दिसून आले.