कोल्हापूर- जिल्ह्यातील काळम्मावाडी धरणाच्या मुख्य भिंतीची गळती वाढली आहे. सध्या धरणाच्या मुख्य भिंतीतून प्रती सेकंद १९० लिटर पेक्षा जास्त पाण्याची गळती होत असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे मेघोली सारखी घटना घडल्यावरच जिल्हा प्रशासन जागे होणार का? असा सवाल आता नागरिकांमधून उपस्थित होऊ लागला आहे. जर भविष्यात धरणाच्या मुख्य भिंतीला तडा गेला तर आजूबाजूच्या वीस ते पंचवीस गावांना त्याचा धोका निर्माण होऊ शकतो, अस मते जाणकारांनी व्यक्त केले आहे. मात्र, त्याची गळती दुरुस्तीचे काम लवकरच हाती घेण्यात येणार असून सद्यस्थितीत धरणाला धोका नसल्याचा खुलासा जलसंपदा विभागाकडून करण्यात आला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यतील सर्वात मोठे धरण म्हणून काळम्मावाडी धरण ओळखले जाते. मात्र धरणाच्या बांधकामाल बरीच वर्षे उलटून गेल्याने आता या धरणाच्या मुख्य भिंतीमधून गळती सुरू झाली आहे. प्रशासनाकडून गेल्या दहा वर्षांंपासून या धरणाची गळती दुरूस्त करण्याचा प्रयत्न सुरू आहेत. मात्र अद्याप हे काम पूर्णत्वास गेले नाही. धरणाची गळती पूर्णपणे बंद करावी यासाठी नागरिकांनी वारंवार मागणी करण्यात येत आहे. अन्यथा या धरणाच्या गळतीमुळे बांधकाम कमकुवत होऊ न कालांतराने भिंत ढासळण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. १३५० मीटर लांबी असलेल्या धरणातील ४९० मीटरपर्यंतचे बांधकाम दगडी आहे. तसेच भितींच्या दोन्ही बाजूला मातीचे बांध आहेत. या ४९० मीटरच्या दगडी बांधकामावर ‘सिमेंट ग्राऊंटिंग’ केले जात आहे. मात्र, सद्य स्थितीत या भिंतीतून पाण्याची गळती सुरूच आहे.महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याचा आंतरराज्य प्रकल्प म्हणून काळम्मावाडी धरणाची धरणाची ओळख आहे. येथील दूधगंगा जलाशयाच्या मुख्य भिंतीला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. धरणाच्या मुख्य भिंतीबरोबर धरणाची गॅलरी, सांधे यासह धरण परिसरातून मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. धरणाच्या मोनोलीत १ ते ९ मध्ये गळतीचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे मेघोलीसारीखी दुर्घटना घडल्यावर यांचे डोळे उघडणार का ? तर काळम्मावाडी धरण सुरक्षेसाठी जलसंपदा विभागाने तात्काळ ही गळती थांबवण्यासाठी उपाय योजना राबवावी, अशी मागणी शेतकरी वर्ग आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा युवा अध्यक्ष अजित पोवार यांनी केली आहे.
मुख्य भिंतीचे काम कमकुवत, गळती काढण्यासाठी खर्च पाण्यात-
सध्या या धरणातून प्रती सेकंद एकशे नव्वद लिटर गळती होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मात्र मुख्य भिंतीतून येणारे पाण्याचे कारंजे बघितले तर गळतीचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येते. यामुळे त्याची तात्काळ दुरुस्ती होणे गरजेचे आहे. धरण बांधणीपासून धरणाच्या मुख्य भिंतीचे बांधकाम कमकुवत झाले आहे, त्यामुळे ही गळती होत असल्याचा अंदाज या गळतीकडे पाहून व्यक्त करण्यात येत आहे.
सध्या धरण शंभर टक्के भरले आहे. यामुळे गळतीचे प्रमाण वाढले आहे, ही बाब गंभीर आहे. यापूर्वी याच धरणाच्या भिंतीची गळती काढण्यासाठी धरणावरून होल मारून सिमेंट ग्राउटिंग, इफोक्सिंग ग्राउटिंग केले आहे. यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. मात्र धरणाची आताची गळती बघितली तर गळती काढण्यासाठी केलेला खर्च पाण्यातच गेला असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा युवा अध्यक्ष अजित पोवार यांनी सांगितले.
तर मेघोलीची पुनरावृत्ती होईल-
मागील महिन्यात भुदरगड तालुक्यातील मेघोली धरण फुटून झालेली दुर्घटना गंभीर आहे. या घटनेमुळे अनेक शेतकरी उद्ध्वस्त झाले असून काळम्मावाडी धरण फुटल्यावरच शासनाला जाग येणार का? असा सवाल पोवार यांनी उपस्थित केला आहे. जिल्ह्यातील मंत्री धरणातून कोल्हापूरला पिण्याचे पाणी नेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र धरणाच्या गळतीकडे लक्ष नसल्याचा आरोपही पोवार यांनी केला. यामुळे दिव्याखाली अंधार असेच म्हणावे लागेल, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
प्रतिसेकंद २०० लिटर पेक्षा अधिक गळती
विश्वसनीय सूत्राकडून धरणातून प्रती सेकंद एकशे नव्वद लिटरची गळती असल्याचे सांगितले जाते मात्र प्रत्यक्षात ही गळती मोठ्या प्रमानात असल्याचे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे. २००९ साली धरणातून सुमारे प्रती सेकंद पाचशे लिटर पाण्याची गळती होती त्यानंतर गळती काढण्यासाठी उपाययोजना राबवली मात्र त्याला फारस यश आल नाही यामुळे या धरणाच्या गळतीचा प्रश्न गंभीर आहे.