कोल्हापूर Shahu Maharaj on Reservation : लोकसभा हे असं स्थान आहे, जिथं सर्वांना आपले विचार व्यक्त करता येतात. काही चर्चा करता येतात ज्यात सर्व भारतीयांच्या हितासाठी योग्य निर्णय घेता येतात, त्याचे महत्व लक्षात घेतले पाहिजे. नव्या संसदेत कामकाजाचा ( New Parliament Inauguration ) श्रीगणेशा करण्यात आला, या संसद भवनात लोकांच्या हिताचे कायदे व्हावेत. समान नागरी कायद्याबाबतही चर्चा ऐकायला मिळते. मात्र, हा कायदा चर्चा होऊनच झाला तर हिताचे ठरेल. तसंच आरक्षण प्रश्नी केंद्र आणि राज्य सरकारनं जनतेला झुलवत ठेवू नये, असे म्हणत कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांनी सरकारचे कान टोचले. कोल्हापुरात ते पत्रकारांशी बोलत होते.
चर्चा करुनच समान नागरी कायदा करावा : भारतीय राज्यघटना 1950 पासून घटना अस्तित्वात आलेली आहे. राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून संसदेचं महत्त्व संविधानात अधोरेखित केलंय. देशात सध्या समान नागरी कायदा करण्याबाबत हालचाली सुरू आहेत. मात्र, हा कायदा करताना राज्यकर्त्यांनी चर्चा करावी आणि मगच हा कायदा करावा, असा कायदा करणे देशाच्या आणि भारतीय जनतेच्या हिताचे ठरेल असंही मत छत्रपती शाहू महाराजांनी व्यक्त केलंय.